Wednesday 14 November 2012

बलिप्रतिपदा



बलिप्रतिपदा !!
काळ्या आईच्या गर्भातून तरारून आलेल्या सा-या निसर्ग सृजनतेचा अविष्कार व त्या निर्मितीचा सोहळा म्हणजे बलिप्रतिपदा. या सृजनतेची पिढ्यान पिढ्या धुरा वाहणा-या शेतक-यांचा पूर्वज बळी हा कधीकाळी शेतक-यांचा राजा होता आणि केवळ राज्यच नव्हे तर सारा कृषिधर्म काय असावा, कसा असावा याचे समग्र तत्वज्ञान त्याकाळी प्रचलित व्यवस्थेचा प्रखर विरोध झुगारत मांडले जात होते हे सारे रोमहर्षकच नव्हे तर चित्तथरारक देखील आहे. आज सा-या व्यवस्थेत हतबल व अडगळ ठरलेला शेतकरी कधीतरी त्याचे स्वतःचे राज्य होते, त्याची धुरा वाहणारा कर्तबगार बळीहा त्यांचा राजा होता व आज कुठलाही मूगमास नसलेले त्याच्या जीवनशैलीचे एक स्वतंत्र तत्वज्ञानही या कर्मयोगी समाजाला समृध्द करीत श्रमसंस्कृतीला जगण्याचे एक समर्पक आयाम व प्रतिष्ठा देत अस्तीत्वात होते याची आठवण देखील या सा-या समाजाला एक नव्या आशेची, उभारीची झेप घेण्यास पुरेशी आहे.
कुठल्याही समाजाची जडणघडण वा मानसिकता ही त्यात पेरलेल्या व जोपासल्या जाणा-या विचार व मूल्यांवर वर अवलंबून असते. विचार व आचार हे परस्परावलंबी असतात व विचारातून आचार व आचारातून विचार असे हे चक्र अव्याहतपणे चालत असते. कधीकाळी निसर्गाशी झुंजणारा हा लढाऊ वास्तववादी समाज आपली समाजमूल्ये विसरत कसा दैववादी संस्कारांचा बळी ठरत गुलामगिरीच्या जोखंडात बध्द होत आजच्या परिस्थितीला येऊन ठेपला याचा इतिहास खरोखरच अभ्यासण्यासारखा आहे. तमाम शेतकरी समाजाच्या दृष्टीने आजची ही बलिप्रतिपदा खरे म्हणजे बळीच्या स्मृतीचा दिन न रहाता दिव्यांचा सण म्हणून साजरी होते, त्यात बळीच्या विचाराचा, आचाराचा कुठेही मागमूस दिसत नाही एवढे निरिक्षण या सा-या समाजाला आत्मपरिक्षण करायला पुरेसे आहे असे वाटते.
इतिहास वा भूतकाळातील हे सारे संदर्भ हे नव्या परिप्रेक्ष्यात ओझे म्हणून न समजता या सा-या शृंखलेत नेमके काय चुकले याचा परामर्ष जर घेता आला तर आजची झालेली कोंडी वा हतबलता यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सापडतो का यादृष्टीनेही त्याचे वेगळे महत्व आहे. शेती हे केवळ भांडवल, श्रम वा उत्पादनाशी निगडीत आहे की निसर्गातून मिळणा-या अलोट उर्जांच्या स्त्रोतांशी संबंधित असलेली जीवनपध्दती आहे याचा पुनर्विचार यासाठी करण्याचे महत्वाचे आहे की आताशा मानवाच्या सा-या सुखाचे व समाधानाचे इंडेक्स आता भौतिक परिमाणापेक्षा मानसिक परिमाणाशी निगडीत होताहेत आणि यात प्रत्यक्ष उत्पादनाच्या वापरातून मिळणा-या लाभापेक्षा उत्पादन प्रक्रियेतच असे काही आहे का ते सुखासमाधानाचा स्त्रोत ठरू शकेल, तेही निसर्गाच्या संमती, सानिध्य वा संलग्नतेने हे पहाणे औसुक्याचे ठरेल.
तत्वाज्ञानाची पार्श्वभूमी असलेली ही मांडणी सर्वसाधारण शेतक-यांना काहीशी क्लिष्ट वाटण्याची शक्यता असली तरी सा-या शेतकरी समाजाने आपल्या सा-या विचारधारा, संकल्पना, धारणा यांच्याबरोबर व्यावहारिक वास्तवतेचे भान राखत आपले सामाजिक आचार विचार ठरवले पाहिजेत. केवळ परंपरा, रूढी आहेत म्हणून त्या पाळल्याच पाहिजे असे भाकड ओझे बाळगण्याचे कारण नाही. असे नियंत्रित वर्तन हे गुलामगिरीचे द्योतक असते व स्वातंत्र्यवादी विचारांसाठी ते एक प्रमुख अडथळा ठरत असते हे लक्षात घेतले पाहिजे. सुदैवाने या सा-या शेतकरी समाजात महात्मा फुले ते गावोगावी वेड्यात काढलेले अनेक बंडखोर विचारवंत अस्तीत्वात असलेले दिसतील. या सा-या गावातील पागल ठरवलेल्या बंडखोरांचे निदान ते काय म्हणतात हे ऐकून घेण्याची सोय जर झाली तर स्वाध्दौरासाठी कुठेही जाण्याची या समाजाला गरज नाही. गेल्या अनेक शतकांपासून गाडलेल्या या बळीराजाला असूनही आपल्या पुनरागमनाची संधी मिळत नसल्याने त्याचे तमाम वंशज यावर काय ठरवतात वा गंभीर होतात त्यावर ते सारे अवलंबून आहे.
                                 डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९   

No comments:

Post a Comment