Saturday 19 December 2015

बदलती शेती – न बदलणारी मनं !!



          बदलती शेती – न बदलणारी मनं !!
          शेतीतील वाढत्या जाणा-या समस्या हे आपल्यापुढील एक मोठे आव्हान असतानांच त्यावरील उपाययोजनांबाबतही सा-यांचा कमालीचा गोंधळ उडालेला दिसतो. सरकारच्या आकलन व अंमलबजावणीबद्दल आक्षेप असणे स्वाभाविक असले तरी शेतक-याला इतर माध्यमातून दिले जाणारे अनाहूत सल्ले व सुचवलेल्या उपाययोजना बघितल्या तर अधिकच गोंधळल्यासारखे होते. खुद्द शेतक-यांना आपल्याला काय हवे याबाबत अनुदानापासून कर्जमाफीपर्यंतच्या वरवर आकर्षक वाटणा-या मागण्यांबाबत मतभिन्नता असली तरी ती शेतीच्या एकंदरीत आकलनाबाबत शंका निर्माण करणारी ठरते. आपल्या बहुपेडी शेतीतील समस्याही बहुपेडी असणार यात शंका नाही मात्र उपाययोजना करतांना निश्चित करावयाचे बदल हे किमान मुद्यांबाबत सहमती दाखवत शेतक-याच्या आताच्या गंभीर परिस्थितीत तातडीने परिणामकारक बदल करणारे असावेत हे कुणीही अमान्य करणार नाही.
          शेतीप्रश्नांच्या आकलनाच्या सर्वात जवळ जाणारी व परिणामकारक ठरू शकणारी मांडणी ही शेतकरी संघटनेने उत्पादन खर्चावर भाव ही दिसते. देशातील शेतीच नव्हे तर सा-या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी व गरिबी निर्मूलन वा ग्रामीण स्थलांतर रोखून शहरांचे बकालीकरण रोखणारी ही मांडणी आहे. आज बदलत्या वातावरणात खुल्या व्यवस्थेत शेतमालाला बाजारातील मिळणारा भाव व त्यातील नफा शेतक-यांना मिळू द्यावा ही मागणी अजूनही बंदिस्त असणा-या शेतमाल बाजारावर करता येऊ शकते. मुळात आजवर ही मांडणी अजून कोणाला खोडून काढता आली नाही, एवढेच नव्हे तर अनेक पक्षांनी निवडणुका जिकण्यासाठी या मागणीचा गैरवापर करत शेतक-यांना भुलवत ठेवल्याचे दिसते. आज ही सारी व्यवस्था नियंत्रित करणा-यांना ही मांडणी अडचणीची ठरत असल्याने प्रत्यक्षात मात्र ती स्वीकारली जात नसल्याचा निष्कर्ष मात्र यातून काढता येतो.
          आज प्रामुख्याने शेतीचे प्रश्न हे उत्पादनाच्या पातळीवर ठेवले जातात. त्यात जमीन, तिचा आकार व पोत, पाऊसमान, सिंचनाच्या उपलब्धता, बिबीयाणी वा किटकनाशके अशा निविष्ठांशी जोडत योजना केल्या जातात. शेतीच्या भांडवल, पतपुरवठा, कर्ज आदि बाबींचाही समावेश केला जातो. मात्र शेतीतील उत्पादनाचे भांडवलात रुपांतर होतांना त्यातील नफा हिरावून घेणा-या शेतमाल बाजाराबाबत फारसे बोलले जात नाही. आज बंदिस्त असणारा हा शेतमाल बाजार अजूनही उपाययोजनांच्या रडारवर आलेला नाही वा येऊ दिलेला नाही. शेतक-यांनी चाळीस रूपयांनी विकलेली तूर बाजारात दिडशे रूपयांनी विकली जाऊ शकते असे विरोधाभासी चित्र अशा व्यवस्थेत दिसते. हंगामात सातशे ते हजारच्या भावाने कांदा खरेदी करत साठेबाजी करून ऐंशी रुपयांनी विकता येतो हेही याच व्यवस्थेत शक्य होते. अशी ही शेतमाल विक्री व्यवस्था उत्पादक शेतकरी व उपभोक्ता ग्राहक यांच्यासाठी न्याय्य ठरावी याच्या सुधाराचा कार्यक्रम ना तर केंद्राच्या अजेंड्यावर आहे ना तर राज्याच्या. याशिवाय शेतमालावरील प्रक्रिया उद्योग, आयात निर्यातीची धोरणे याबाबत निश्चित असा कार्यक्रम आखून त्यावर काही सकारात्मक होत असल्याचे दिसत नाही. एकंदरीत शेतीच्या प्रश्नांचे राजयिकीकरण व त्यावर प्रशासकीय अंमलबजावणीचा साज चढवत शेतक-यांसाठी आम्ही काहीतरी भव्यदिव्य करीत आहोत हे दाखवणे फारसे खरे नाही. आजवर या प्रारूपाचा शेतीच्या प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने काहीएक उपयोग झालेला नाही व शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्याही कमी न होता वाढतच चालल्याचे दिसते.
या अर्थवादी काळात शेती हा केवळ पोट भरण्याचा धंदा राहिलेला नसून एक उद्योग म्हणून आकाराला येत असल्याने तिची सारी परिमाणे बदललेली दिसतील. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. प्रगती हो वा अधोगती, ती कुठल्याही बदलाशिवाय शक्य नाही. असे हे बदल न स्वीकारणा-यांना निसर्ग अव्हेरतो व कदाचित आपल्या नियमित वाटचालीतून बाजूलाही सारतो. अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील. या सा-या बदलांना अगोदर वैचारिक पातळीवर समजून घ्यायची आवश्यकता असते व त्याला अनुरूप असणारी मानसिकताही जोपासावी लागते. जग बदलले, शेती बदलली तरी शेतकरी मात्र बदलला नाही. त्याची मानसिकता अर्थवादाला अनुरूप ठरण्याऐवजी जातपात, धर्म वा कर्मकांड यांच्याभोवतीच घुटमळत राहिल्याने तो अधिकच दैववादी होत गेल्याचे दिसते. उद्योग ही संकल्पना शास्त्रीय प्रमेयांवर आधारलेली असून भांडवल, नफातोटा व वाढ यांच्या संबंधीची एक वस्तुनिष्ठ, व्यावहारिक भूमिका असणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या विचार प्रक्रियेतूनच आपल्या समस्या सोडवण्याची सवय उद्योजकाला असावी लागते व त्या क्षमतेवरच तो आपल्या उद्योगाचे भवितव्य ठरवू शकतो. आजच्या शेतक-यांमध्ये आवश्यक असणारी व्यावहारिकता व वस्तुनिष्ठता त्याच्या विचारात व म्हणून निर्णयात व आचरणात दिसत नाही. जातीधर्म व कर्मकांडांचा प्रचंड प्रभाव असलेल्या या जनसमूहावर झालेले शतकोवर्षांचे संस्कार पुसणे फार महत्वाचे आहे.
एक चांगली गोष्ट की आपल्या शेतक-यांमध्ये उद्योजकता ठासून भरलेली असली तरी तिच्या असण्याचा फायदा त्याला काही होत नाही. त्याच्या उत्पादनातील नफ्याचा वाटा त्याच्यापर्यंत पोहचत नाही. तो का व कसा हा वेगळा प्रश्न असला तरी शेतक-यांना मदत करणा-या सरकार वा इतरांमध्ये हा प्रश्न कधी चर्चेला येऊ दिला जात नाही. हा डाव शेतक-यांच्या लक्षात येत नाही. कारण त्याला इतक्या वस्तुनिष्ठतेने विचार करण्याची सवय नाही. कोणी काही सांगितले की त्याच्यावर तो आंधळेपणाने विश्वास टाकतो. याचाच गैरफायदा ही व्यवस्था घेत आल्याचे दिसते.
सुदैवाने शेतक-यांची नवी पिढी ही अधिक जागरूक व प्रश्नांच्या मुळाशी जाणारी आहे. उद्योगाला आवश्यक असणारी वस्तुनिष्ठता, व्यावहारिकता व एकंदरीतच वैचारिक स्पष्टता या पिढीत दिसते. त्यांचा या सा-या संकट निवारणातील सहभाग देखील वाखाणण्यासारखा आहे. ठिकठिकाणचे तरूण शेतकरी जातपात तर सोडा सारे राजकिय सामाजिक मतभेद विसरून शेतीच्या प्रश्नांचा चक्रव्युह भेदण्यासाठी एकत्र येऊ लागले आहेत. इतर क्षेत्रात स्थिरावलेली व यशस्वी झालेली शेतक-यांची मुले केवळ शेतीच्या उज्वल भवितव्यासाठी एकत्र येत असून हे महान कार्य सरकार वा केवळ नक्राश्रु ढाळणारी व्यवस्था करणार नाही हे त्यांना पटल्याने शेतीच्या सर्वतोपरि मदतीसाठी ते पुढाकार घेत आहेत.
शेतीतील स्त्रीशक्तीची ताकद व महत्व हे शेतकरी संघटनेनेच ओळखले होते. आजच्या कठीण व गंभीर परिस्थितीत ही शक्ती जर सक्रीय झाली तर शेतीला एका नव्या विकासाचे परिमाण लाभू शकेल. नाही तरी आजवर कशीबशी टिकून राहीलेली शेती ही या स्त्रीशक्तीच्या बळावरच आहे हे शेतीच्या जाणकारांना जाणणे नवे नाही. येणा-या काळात बाकी सर्व अनुत्पादक फाफटपसारा विसरून शेती एके शेती हा एकच कार्यक्रम हाती घेतल्यास या क्षेत्राची या कचाट्यातून सुटका होईल, अन्यथा नाही.
डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmsil.com. 9422263689



Wednesday 2 December 2015

शेतमाल बाजार सुधार



शेतमाल बाजार सुधार
कारणे, उपाय व अंमलबजावणीतील आव्हाने
                सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो व आभार मानतो यासाठी की शेतमाल बाजाराच्या गंभीर परिस्थितीबाबत संबंधित घटकांना विश्वासात घेऊन त्यावर विचार विनिमय करण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणा-या कार्यकर्त्यांची समिती नेमण्यात आली. आता या संधीचा फायदा ही समिती वा शासन कशाप्रकारे घेते यावर या प्रयत्नाचे यशापयश ठरणार आहे.
                माझ्या या विषयाच्या आजवरच्या आकलनानुसार मी हे मु्द्दे मांडत आहे. ते चर्चेसाठी पूर्णपणे खुले आहेत. स्थलकालानुसार काही बाजार समित्यांतील परिस्थिती भिन्न असू शकते मात्र धोरणात्मक विचार करतांना यातील सर्व घटकांचे व्यापक हित लक्षात घेऊन बाजार या संकल्पनेला काय अपेक्षित आहे याचा प्रामुख्याने विचार केला आहे. कुठलाही बदल हा नकोसा असतो व प्रस्थापितांना तर तो नकोच असतो. मात्र होणारा बदल सा-यांना हितकारक ठरणार असेल तर तो सा-यांनी खुलेपणानी स्विकारावा हीच एक अपेक्षा.
बाजार – एक संकल्पना,
बाजाराचा न्याय्यता हा एक महत्वाचा गुणधर्म असतो. उत्पादक व उपभोक्ता हे बाजाराचे मुख्य घटक. त्यांच्यातील देवाण घेवाणीतील न्यायता जोपासत या दोन्ही घटकांचे हित साधले जात असते. बाजारातील इतर सारे अनुषांगिक घटक या बाजारातील व्यवहारांचे पावित्र्य जपायला कटिबध्द असावेत. बाजार सुरळीत चालण्यासाठी सक्षम अशा कायदा व सुव्यवस्थेचीही गरज असते. हा सरकार व बाजाराचा संबंध सोडला तर सरकारचा बाजारात कुठलाही हस्तक्षेप नसणे अभिप्रेत असते. या सा-या कसोट्यांवर आजचा भारतीय शेतमाल बाजार बघितला तर यातील कुठलेही निकष पूर्ण होत नसल्याने तो आदर्श तर सोडा, किमान बाजार म्हणण्याचाही प्रश्न पडावा.
बाजारात निर्णयाचे स्वातंत्र्य हा एक कळीचा मुद्दा असतो. ही निर्णय प्रक्रिया अत्यंत निखळ पध्दतीने पार पाडली जावी. यातील  मागणी-पुरवठा या सारख्या नैसर्गिक ताणतणावाचा भाग सोडला तर इतर कुठल्याही मार्गाने विक्रेता वा खरेदीदारावर आपल्या भूमिका पार पाडतांना बंधन, दबाब वा सक्ती असू नये. असेच स्थळ, काळ व निकड या घटकांचाही परिणाम दोन्ही घटकांवर समानतेने होत त्याचे कुठलाही असंतुलन एकाद्या घटकाला अन्यायकारक ठरू नये. किंवा बाजारातील परिस्थिती एकाद्या घटकाला अनुकूल ठरत त्याचवेळी ती दुस-या घटकावर अन्यायकारक होईल अशी धोरणे सरकार नामक व्यवस्थेने टाळत व्यावहारिक नैतिकतेचे पालन होईल अशी कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्यावी. एकंदरीत सरकारने निष्पक्षपातीपणे बाजारात वावरणे फार गरजेचे आहे.
आपला आजचा शेतमाल बाजार, 
दुर्दैवाने आजच्या आपल्या शेतमाल बाजारात बाजार या संकल्पनेचे मूलभूत निकषही पाळले जात नसल्याने त्यात अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत. या विकृतींवर सरकारला योग्य ती उपाय योजना करण्यात अपयश आल्याने उत्पादक शेतकरी व उपभोक्ता ग्राहक या दोन्हीचे नैसर्गिक हित बाधित होत आहे. कृषि उत्पन्न खरेदी विक्री नियमन कायदा हा मुळातच आज कालबाह्य झाला असून त्यातील राक्षसी तरतुदींचा गैरफायदा घेत काही एकाधिकार तयार झाले असून सारा शेतमाल बाजार, निर्यात व प्रक्रिया उद्योगावर त्याचे अनिष्ट परिणाम होत राष्ट्रीय उत्पन्नाचीही हानी होत आहे.
आज या कायद्यातील सुधाराबाबत सरकार अत्यंत नकारात्मक भूमिकेत आहे. केंद्राने याबाबत नवा कायदा आणून देखील राज्य सरकारे त्याच्या अमलबजावणीबाबत गंभीर नाहीत. एकंदरीत काहींच्या फायद्याची ठरणारी ही व्यवस्था अशीच चालू रहावी अशी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची इच्छा दिसते. या सा-या मगरमिठीतून शेतकरी व ग्राहकांचे हित कसे जोपासायचे हा मोठा यक्षप्रश्न झाला आहे.
आज राज्यातील शेतमाल बाजाराची अवस्था बघता ज्या शेतीमालाच्या न्याय्य व पारदर्शक विपणनाच्या उद्देशासाठी ही सारी यंत्रणा उभारण्यात आली नेमका तोच नेमका हरवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेतील एका प्रमुख घटकाच्या भवितव्याच्या प्रश्नाबरोबर आज विपन्नावस्थेत जगणा-या शेतकरी व आपल्या तुटपुंज्या उत्पन्नात गुजराण करणा-या ग्राहकांच्या जीविताच्या हक्कावरच टाच आल्याचे दिसते. अत्यंत दूर्लक्षित व गैरव्यवस्थापनाने दूरवस्थेला आलेल्या या बाजारात आवश्यक असणा-या सुधारांच्या जंत्रीपेक्षा त्यांच्या अंमलबजावणीबाबत गहन प्रश्न निर्माण झाले आहेत. कारणे काही का असेनात मात्र ही परिस्थिती आहे तशीच चालू ठेवण्यात काही घटकांचा आग्रह तणावाचे मुख्य कारण असून त्यात मुख्यत्वे बाजार समित्यांची कार्यपध्दती, त्यात कार्यरत असणारे काही असामाजिक घटक व त्यावर आजवर शासनाची नियंत्रक म्हणून अपयशी ठरलेली कारकीर्द यांचा प्रामुख्याने विचार करता येईल. आता आलेल्या नव्या शासनाने यावर अभ्यास, त्यावरून अचूक निदान व कठोर कारवाई या मार्गांचा अवलंब केल्यास यातील सर्व घटकांचा वैध अधिकार अबाधित ठेवत एक न्याय्य व पारदर्शक बाजार व्यवस्था निर्माण करता येईल.
बाजार समित्या – रचनात्मक बदल, 
आज राज्यातील शेतमाल बाजार हा सहकारी बाजार समित्यांमार्फत नियंत्रित केला जातो. या बाजार समित्या कायद्यानुसार स्थापित होत असल्या तरी त्यात शेतक-यांचे प्रतिनिधीत्व योग्य त्या मात्रेने व पध्दतीने पडत नसल्याने प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या या व्यवस्थेत काही चुकीचा उद्देश ठेवणा-या घटकांचा प्रवेश सुकर झाला आहे. आज या बाजार समित्यात कर रूपाने रोज रोखीत प्रचंड महसूल गोळा करण्यात येत असून त्याच्या हिशोब व विनियोगाबाबत कुठलेही प्रभावी नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. बाजार समितीत शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून जे निवडले जातात ते या बाजारात शेतमाल विक्रीला आणणारे सर्वसामान्य शेतकरी नसून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायट्यांचे संचालक असतात. ग्रामीण भागातील या घटकांमधील आरक्षित वर्गाचे प्रमाण लक्षात घेता महिला, जातीय व इतर घटकांचा ज्यांचा उत्पादक शेतकरी व शेतमाल बाजाराशी तसा सरळ सबंध नसतो. एका वेगळ्या व्यवस्थेतील व वेगळ्या उद्दिष्टासाठी निवडलेल्या प्रतिनिधींचा बाजार समितीच्या निर्मितीसाठी केलेला हा गैरवापरच असून काही चाणाक्ष राजकारण्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा फायदा घेतलेला दिसतो. अशा प्रकारचे मतदान हे मर्यादित स्वरूपाचे असल्याने त्यात मते विकत घेऊन निवडून येणा-यांचे फावते व काही गुंतवणूकीवर एवढ्या आर्थिक उलाढालीवर नियंत्रण मिळवता येत असेल तर ठरवून या बाजार व्यवस्थेत प्रवेश मिळवता येतो. एवढेच नव्हे तर मिळणा-या अधिकारांचा गैरवापर करत या बाजारात आपले स्वार्थ अबाधित ठेवण्याची कार्यपध्दती विकसित करण्यात येते व त्यातून आजच्या सारखे अराजक निर्माण होऊन ज्यांच्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश होता तो सफल करण्यात अपयश येते.
उपाय, 
१. शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून जे शेतकरी या बाजारात माल विक्रीला आणतात ते किंवा ज्यांच्या नावाचा सातबारा आहे अशांचा स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करून त्यातून शेतक-यांचे प्रतिनिधी निवडून यावेत.
२. बाजार समिती ही केवळ व्यवस्थापकीय संस्था ठेवत, भांडवली गुंतवणूक, मालमत्तेबाबतचे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार काढून त्यांचेकडे फक्त बाजार आवाराचे व्यवस्थापनाची जबाबदारी  ठेवावी.
३. बाजार समितीवरील नियंत्रणाची जबाबदारी निश्चित करावी. पणन व सहकार खात्याचे बाजार समितीच्या कारभारावर सक्षम नियंत्रण हवे व गैरप्रकारांवर वेळीच कारवाई झाली तर एवढ्या विकोपाला गोष्टी जाणार नाहीत. आज जिल्हा उपनिबंधक व पणन मंडळाच्या अधिका-यांना हाताशी धरून अनेक गैरप्रकार केले जातात. हे गैरप्रकार न्यायालयात सिध्द होऊनही उचित कारवाई न झाल्याची गंभीर दखल पणन व सहकार खात्याने आता घ्यायला हवी. दहा दहा वर्षे बाजार समित्यांचे हिशोब वा लेखापरिक्षण न झाल्याची उदाहरणे आहेत.
४.एवढेच नव्हे तर या बाजार समित्यांमध्ये येणा-या शेतक-यांच्या सुरक्षितेचाही प्रश्न फार गंभीर झाला आहे. शेतमालाच्या वजन मापाचे कायदे कुठे पाळले जात नाहीत. त्याच्या शेतमालाची राजरोसपणे होणारी चोरी बाजार समित्या थांबवू शकलेल्या नाहीत. त्याच्याकडील पैशांची लूटच नव्हे तर या विरोधात आवाज उठवणा-या शेतक-यांवर जीवघेणे हल्ले झाल्याची अनेक उदाहरणे जाहीर झालेली आहेत. यावर शेतक-यांनी मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारींबाबत आयोगाने बाजार समित्या, सहकार व पणन खात्यावर ताशेरे ओढले असून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी बाजार समित्यांचीच असल्याचे आपल्या निकालात म्हटले आहे.
५. ताबडतोबीने करता येण्यासारखा उपाय म्हणजे ज्या बाजार समित्यात कायद्याचे पालन होत नाही, ज्यात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत, ज्यांचे आर्थिक व्यवहार वा लेखापरिक्षणात चूका झालेल्या आहेत अशांना बरखास्त करून त्यावर प्रशासकीय नियंत्रण आणावे व शासनाची वैध कार्यप्रणाली प्रस्थिपित करावी.
६. प्रशासक म्हणून या विषयातील माहितगार व तज्ञ अधिका-यांची निवड करावी. सुदैवाने आज उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासनानेच प्रमाणित केलेल्या सचिव पॅनेल मधील उमेदवारांची मदत घ्यावी कारण या सा-यांचा शेतमाल बाजार कायदा व व्यवस्थेचा अभ्यास उत्तम असल्याचे दिसून आले आहे.
बाजार समित्या – अधिकार व कार्यपध्दती, 
बाजार समित्या या सहकार कायद्यांन्वये स्वायत्त संस्था म्हणून गणल्या जातात. निवडून आलेले संचालक मंडळ सचिवांच्या साह्याने कारभार बघतात. या निवडून आलेल्या संचालकांचा बाजार या संस्थेबाबतचा अभ्यास काहीच नसल्याने त्यांचा गैरवापर होण्याची उदाहरणे दिसतात. सदरचा कारभार हा वैध व कायद्यानुसार करण्याची जबाबदारी सचिवांवर येते. आर्थिक व्यवहाराला त्यांची संमती आवश्यक असल्याने त्यांच्याकरवी नियंत्रण करणे सोपे जाऊ शकते.  केंद्राच्या एका अभ्यास गटाला हे सचिव प्रशिक्षित वा बाजार व्यवस्थेतील तज्ञ नसल्याने बाजारात अनेक गैरप्रकार स्थापित होत त्यांना परंपरा वा प्रथांच्या नावाखाली समर्थन प्राप्त होत असल्याचे लक्षात आले. त्यात शेतक-यांचे शोषण करणा-या वजनमापाच्या, भावाच्या व सुरक्षिततेच्या अनेक समस्या निर्माण झाल्याने राज्य शासनाने प्रशिक्षित व तज्ञ सचिवांचे पॅनेल तयार करून त्यांची नियुक्ती या बाजार समितीत करण्याविषयीचा प्रस्ताव करून त्यानुसार राज्यात सचिव पॅनेलची निर्मितीही झाली. त्यापैकी काही सचिवांची नियुक्ती झाली असून त्या बाजार समित्यांतील कारभार सुधारल्याचे सिध्दही झाले आहे. मात्र ही सुधारणा तांत्रिक मुद्यावर न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्यात आली व इतर बाजार समित्यांतील सचिवांच्या नेमणुकांवर स्थगिती आणण्यात आली. राज्य सरकारने यावर कायदेशीर मत घेऊन ही बंदी उठवावी व तज्ञ व प्रशिक्षित सचिवांना या बाजार समित्यामध्ये कार्यरत करावे.
शेतमालाची अनैसर्गिक कोंडी, 
आज प्रचंड प्रमाणात उत्पादित होणारा शेतमाल ग्राहकांपर्यत किरकोळ बाजारात पोहचण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करीत या शेतमालाच्या खरेदीचे अधिकार सिमित करण्यात आले असून त्यायोगे या यंत्रणेची खरेदी क्षमता गरज नसतांना संकुचित करण्यात आली आहे. परवाना देण्याचे अधिकार वापरत या बाजारात स्पर्धेसाठी पुरेसे खरेदीदार येऊ दिले जात नाहीत त्यामुळे शेतमालाचे भावच नव्हे तर खरेदी करायची किंवा नाही असे गंभीर निर्णय घेण्याचे अधिकार काही विशिष्ठ घटकांकडे एकवटले आहेत. भावाचे तर जाऊ द्या केवळ विक्री न झाल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल घरी नेणे परवडत नाही म्हणून शेतक-यांना रस्त्यावर फेकून द्यावा लागल्याची अनेक उदाहरणे माध्यमातून सातत्याने प्रसिध्द होत असतात. या गैरप्रकाराची जबाबदारी घेण्यासाठी ना तर अधिकृत खरेदीदार ना तर बाजार समित्या पुढे येतात. त्यांच्यावर नियंत्रण असणारे पणन मंडळ व सहकार खातेही याबद्दल आपला काही संबंध असल्याचे दाखवत नाही.
केवळ बाजार समित्यांना शेतमाल विक्रिच्या प्रक्रियेत विविध सेवा देणा-या घटकांना परवाने देण्याचे अधिकार असल्याने ते अशा विशिष्ट हेतुसाठी वापरले जातात. खरेदीदार, आडते, दलाल, मापारी, हमाल यांना परवाने देण्याचे अधिकार हे पारदर्शक न रहाता त्याबाबत अनेक तक्रारी आहेत. या सर्वात महत्वाचा भाग खरेदीदार व्यापा-यांच्या परवान्याचा असतो. एकदा सदरचा परवाना मिळाला की शेतमालाच्या लिलावात भाग घेऊन शेतमाल खरेदी करता येतो. शेतक-यांना मिळणारा शेतमालाचा भाव हा सर्वस्वी या लिलावात भाग घेणा-या व्यापा-यांवर अवलंबून असतो.
आज या बाजारात खरेदीसाठी प्रतिक्षेत असलेले अनेक प्रामाणिक व्यापारी, निर्यातदार, प्रक्रिया उद्योग या बाजारात खरेदीसाठी उत्सुक असून त्यांना खरेदीसाठी स्वतंत्र परवानगी न मिळाल्याने प्रस्थापित खरेदीदारांकडेच जावे लागते. यात शेतमालाची बाजारातील प्रत्यक्ष किंमत व शेतक-यांना मिळणारी किंमत यात प्रचंड तफावत दिसते व ती केवळ खरेदीच्या एकाधिकारामुळे निर्माण झाल्याचे दिसते. यातून प्रचंड अवैध काळा पैसा तयार होत असून बाजार समित्यांचे व्यवस्थापन, राज्याचे प्रशासन यांना प्रभावित करीत राजरोसपणे चालू असल्याचे दिसते. यातून राज्याचा महसूल व इतर करांबाबतचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
                अ. आज शेतमालाच्या वाढत्या उत्पादनानुसार त्याप्रमाणात बाजार समित्यांतील मालाची आवकही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र बाजार समित्यातील खरेदीदार व्यापा-यांची संख्या व त्यावर आधारलेली त्यांची खरेदीची क्षमता त्याप्रमाणात वाढू दिलेली नाही. यात काही खरेदीदारांचा एकाधिकार वाढीला लागून विक्रेता शेतकरी यांचे परावलंबित्व वाढते कारण त्याच्या आपला माल विकण्याच्या व त्याला उचित भाव मिळण्याच्या संधी यामुळे संकुचित होतात. दुसरीकडे हा शेतमाल बाजारात विकणा-या विक्रेत्यांनाही मालासाठी या एकाधिकारी व्यापा-यावरच अवलंबून रहावे लागते. या दुहेरी मनमानीमुळे खरेदीदार खरेदी करतांना आपल्या एकाधिकाराचा वापर करीत स्पर्धा निर्माण न होऊ देता शेतक-यांना किमान भाव देतो व त्याच वेळी आपल्याशिवाय बाहेर कुणाला शेतमाल मिळणार नाही याची काळजी घेत इतर विक्रेते व किरकोळ बाजारात चढ्या भावाने तो माल विकतो. अशा प्रकारच्या बाजारावर प्रभुत्व मिळवलेले व्यापा-यांचे गट सा-या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कार्यरत असून शेतमालाची कोंडी करीत त्याला त्याच्या विहित हक्कांपासून वंचित करीत आहेत. यासाठी बाजारात जेवढे खरेदीदार वाढतील तेवढे वाढवावे व त्यांत स्पर्धा निर्माण करीत पारदर्शक पध्दतीने विक्री करावी. येईल त्याला परवाना व रोखीने व्यवहार करणा-या खरेदीदारांना कुठले बंधन न ठेवता प्राधान्य द्यावे व रोखीचा बाजार कसा वाढेल व स्पर्धा कशी आणता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे.
ब. निर्यातदार व प्रक्रिया गटांना वेगळे कक्ष देऊन ज्या शेतक-यांनी प्रतवारी केलेला माल आणला असेल त्यांना अधिक भाव मिळण्यासाठी उद्युक्त करावे. बाजार समितीत येणा-या मालाची घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ असे कक्ष करावेत व त्या मालाची विक्री विभागत ठराविकच खरेदीदारांवर पडणारा खरेदीचा ताण कमी करता येईल. वेगवेगळ्या गटातील खरेदीदारांना आपल्या गरजेनुसार सरळ शेतक-यांकडून माल घेता येईल व किरकोळ बाजारातील नफा शेतक-यांपर्यंत पोहचवता येईल.
क. बाजार समिती व्यतिरिक्त सा-या सौद्यांना वैध ठरवावे व त्याच्या अटी शर्थी देणारा व घेणारा यांना परस्परात ठरवू द्याव्यात. आज बाजार समित्यांच्या भौगोलिक स्थानानुसार विक्रीसाठी  प्रत्यक्ष न्यावा लागतो. या शेतमालाच्या विनियोगाचे ठिकाण प्रत्यक्षात वेगळे असते. यात शेतमाल वाहतूकीच्या खर्चाच्या ताणाबरोबर नाशवंत मालाच्या हाताळणीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता शेतक-यांना काही एक कारण नसतांना नुकसानीचे ठरते. बाजार समित्यांबाहेर होणा-या व्यवहारांमुळे हे नुकसान टळून शेतक-यांना दोन पैसे अधिकचे मिळू शकतील.
ड. खुद्द बाजार समितीत देखील एक मुक्त द्वार विभाग असावा व त्यातील दर बघून शेतक-यांना तेथे माल विकण्याची मुभा असावी. त्यात रोखीच्या व्यवहाराची अट घालता येईल.
ई. परराज्यातील वा परदेशातील खरेदीदारांसाठी पणन मंडळाचे एक मार्गदर्शक कार्यालय प्रत्येक बाजार समितीत असावे. शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाची गुणवत्ता व दरांची अद्ययावत माहिती त्यात असावी व तसे दर देणा-या खरेदीदारांची व शेतक-यांची भेट घडवत व्यवहार होऊ शकतील.
३. या बाजारात इतर अनुषांगिक सेवा देणा-यांसाठी परवाना पध्दत असू नये. ज्यांची सेवा उत्तम व चोख असेल अशा सेवेक-यांची निवड करण्याचा अधिकार शेतक-यांना हवा. एकदा शेतक-यांने शेतमाल बाजार समितीत आणला की या सेवेक-यांचा सेवा देण्याचा हक्क प्रस्थापित झाला असे होऊ नये. कुणा सेवेक-यांची सेवा आवश्यक आहे अथवा हे शेतक-यांने ठरवल्यानंतर त्याला उपलब्ध असलेल्या सेवेक-यांतून निवड करता यावी. त्याबाबतचे दर दोघांच्या गरजेनुसार ते आपापसात ठरवतील. यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी बाजार समितीची असेल.
४. आजच्या या आधुनिक जगात आडत ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. संपर्क व दळणवळणाची संसाधने व प्रगत तंत्रज्ञान यामुळे कधीकाळी या सोई नसल्याने वापरात आलेली ही प्रथा व तिची सक्ती शेतक-यांवर अन्यायकारक ठरते. बाजार समित्यांतील खरेदीदारांची संख्या व खरेदी क्षमता वाढवणे व रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य देणे हा यावरचा उपाय. यात आजचे आडते आपल्या खरेदीदारासाठी माल इतर खरेदीदारासारखा खरेदी करू शकतील मात्र त्याला आडतीसारख्या कपाती करता येणार नाहीत.
५. यात बाजार समिती कायद्यात विषद केलेली साठवणूक व्यवस्था बाजार समित्या करू शकलेल्या नाहीत म्हणून अजूनही या प्रथेचे अस्तित्व जाणवते आहे. यावरचा उपाय म्हणून केंद्राने वखारीचा कायदा पारित केला असून बाजार समिती वा इतर मान्यताप्राप्त वखारीत आपला माल शेतक-यांनी ठेवल्यास त्या पावतीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चा दर्जा प्राप्त होत त्यावरच्या शेतमालाच्या बाजार मूल्याच्या ७५ टक्के रक्कम शेतक-यांला बँका देऊ शकतील व त्याची माल विकण्याची निकड पूर्ण होऊ शकेल. आज ही सुविधा कार्यान्वित नसल्याने आडतीसारख्या सेवा वापरात आहेत.
आज आडत कोणाकडून किती घ्यायची हा कळीचा प्रश्न नसून शेतक-यांच्या हातात त्याच्या मालाचे उचित मूल्य पडते की नाही हे पहाणे महत्वाचे आहे. आडत कोणाकडूनही वसूल झाली तर ती आडते व्यापारी आपल्या नफ्यातून देणार नाहीत त्याचा बोजा शेवटी उत्पादक वा ग्राहक यांच्यावरच पडणार आहे. तेव्हा अशा सापळ्यात न अडकलेले बरे. आडत कितपत ग्राह्य वा तिला काही योग्य पर्याय देता येतात का हे पहाणे महत्वाचे ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत बाजार समित्यांच्या बळकटीकरणाचा प्रयत्न आत्मघातकी ठरेल. फार तर त्या सुनियंत्रित कराव्यात असे म्हणता येईल. आपले विहित कर्तव्य बजावण्यात त्या यशस्वी झाल्या तर त्या आपोआपच बळकट होतील सरकारच्या बळकटीकरणाची त्यांना काही एक गरज राहणार नाही. नियंत्रणे मग ती बाजार समिती आवारातील असोत वा बाहेरची, बाजार व्यवस्थेला मारकच ठरतात. शेवटी देवाणघेवाणीच्या अटी या विकणारा व घेणारा यांच्या हिताच्या असल्या तर काल स्थान वा परिस्थिती यांना फारसे महत्व रहात नाही. त्यांना त्याच्या विक्रीचे वा खरेदीचे स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपले ध्येय असले पाहिजे.
खरे म्हणजे आज उपस्थित करण्यात येणारे आडत वा हमालतोलाईच्या दरांचे प्रश्न हे बंदिस्तपणाच्या आजाराची लक्षणे आहेत. मूळ आजाराला खुलेपणाने हात घातला तर ते सहजपणे सुटू शकतात. आजवर अनिर्बंधपणे उपभोगलेल्या एकाधिकाराचे फायदे उपटण्याचे व्यसन आता जनजागृती, कायद्यातील बदल वा बदललेल्या सरकारमुळे गमवावे लागण्याच्या भितीमुळे हे सारे घटक सजग झाले असून आपल्या ताकदीवर हे सारे बदल नाकारणाच्या प्रयत्नांचा एक भाग ठरू पहाताहेत. आजच्या या विचित्र कोंडीमुळे शेतकरी, ग्राहक व सरकार समजत असून वा अधिकार असूनही काही करू न शकणा-या परिस्थितीत सापडले आहेत. त्यामुळे हे सारे प्रकरण घिसडघाईने न हाताळता सावकाशपणे एक निश्चित असा कार्यक्रम आखून, तो कठोरतेने राबवला तरच हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकेल.
इतर आक्षेप
फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या देशातील औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने शेतमाल बाजाराच्या सुधारासाठी बाजार समित्यांचा कायदा रदबादल करण्याची जाहीर मागणी केली आहे. किरकोळ किराणा क्षेत्रात येऊ घातलेल्या परकीय गुंतवणुकदारांनीही या व्यवस्थेबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. देशातील शेतमाल घाऊक उद्योग,  निर्यातदार व प्रक्रिया उद्योजक यांनीही या बाजारात खुलेपणाची मागणी केली असून खरेदीवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे.
कॅगने आपल्या आर्थिक सर्वेक्षणात जाहीर केलेले कृषि उत्पादनाचे आकडे व या बाजार समित्यांतून झालेली त्याच्या विक्रीची नोंद यात प्रचंड तफावत असून बाजार समित्यांच्या कामकाजाबाबत प्रश्न निर्माण करणारे आहेत. मात्र राजकीय दबाबामुळे या सा-या बाजार समित्यांना संरक्षण दिले जात असून एक संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.
मॉडेल एक्ट
शेवटचा एक महत्वाचा मुद्दा हा मॉडेल एक्टसंबंधी आहे. आजवर आम्ही बाहेरच नव्हे तर विधानसभेत देखील जाहीर झालेले ऐकत होतो की महाराष्ट्र शासनाने हा कायदा स्विकारलेला आहे. याबाबतचे वास्तव असे आहे की खाजगी बाजार वा काँट्रॅक्ट फार्मिंग सारखी काही कलमे घालून आपण जूनाच कायदा त्यातील अनिष्ट तरतुदींसह तसाच ठेवला आहे. राज्यातील शेतक-यांची ही घोर फसवणूक असून केंद्राने एवढा अभ्यासपूर्वक केलेल्या कायद्याचे फायदे राज्यातील शेतक-यांना उपभोगता येत नाहीत. याचे साधे उदाहरण म्हणजे हा कायदा जर आपण स्विकारला असता तर त्यातील आडतीच्या तरतुदीनुसार आडत हा वादाचा मुद्दाच झाला नसता. या मॉडेल एक्टच्या कलम ४१-४ नुसार आडत्याला बाजार समितीने विहित केलेल्या दराने आडत खरेदीदाराकडूनच वसूल करता येईल. शेतक-यांला कुठलीही कपात न करता त्याला पैसे द्यावेत असे म्हटले आहे. राज्य शासनाला अजूनही हा कायदा स्विकारून त्याचे फायदे सर्वांना देता येतील.
हमीभावाची परवड, 
शेतमालाला हमीभाव मिळवून द्यायची मोठी जबाबदारी बाजार समित्यांवर असते. बाजारात शेतमालाला रास्त भाव नसतात तेव्हा शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून किमान हमी दराने बाजारात व्यवहार व्हावेत असा कायदा आहे. मात्र खरेदी करण्यात येणा-या मालाच्या प्रतवारी व गुणवत्तेबाबत अनेक किचकट अटी आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात अशा अटींचे पालन करणे कठीण असते व त्यांचा भ्रष्टाचारी वापर व्हायची उदाहरणेही आहेत.  अशी खरेदी करण्याची  जबाबदारी ज्या खरेदी विक्री संघावर आहे त्यांच्यावर बाजार समित्या वा पणन मंडळाचे थेट नियंत्रण नाही. एक तर हे सारे खरेदी विक्री संघ एकतर भ्रष्टाचाराने डबघाईस आले आहेत वा त्यानी खरेदी केलेल्या मालाचे पैसे मिळतीलच याची निश्चिती नसल्याने शेतकरी त्यांना माल द्यायला धजावत नाहीत. नाफेडसारख्या संस्थांनाही बाजार समित्यांशी जोडण्यात आलेले नाही. शेवटी गरजवान शेतक-यांना पर्याय न उरल्याने बाजार समितीत जो काही भाव मिळेल तो घ्यावा लागतो व कमी भावात शेतमाल खरेदी करण्याचे एक प्रभावी हत्यार आपसूकच खरेदीदारांच्या हाती लागते.
या शेतमाल बाजारातील सारी परिस्थिती एवढ्या विकोपाला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे नियंत्रणाचा अभाव. या बाजार समित्या सहकार कायद्यान्वये स्थापित असल्यामुळे सहकार खाते म्हणजे जिल्हा उप निबंधक यांना कारवाईचे अधिकार असून देखील सारी कारवाई पणन खात्यावर ढकलली जाते. पणन ती परत सहकार खात्यावर टोलवून स्वतः नामनिराळे रहात या गैरप्रकारांना एकप्रकारे अभयच मिळत जाते. त्यामुळे सोकावलेल्या व कारवाईला मुळीच भिक न घालणारे घटक बेफाम झाले असून शासनाचे अधिकृत आदेशही न जुमानता बाजार बंद पाडण्याची धमकी देत सा-या निष्पाप घटकांना वेठीस धरत आहेत. या सा-या विचित्र परिस्थितीमुळे यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया अत्यंत बिकट झाली असून सा-या व्यवस्थेचा व कायद्याचा सखोल अभ्यास करून टप्पाटप्प्प्याने कारवाई करणारी एक स्वतंत्र यंत्रणा नेमून त्यावर परिणामांची जबाबदारी सोपवत पार पाडावी लागेल. अन्यथा एकंदरीतच बाजारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहे ती परिस्थिती तशीच पुढे चालू ठेवण्याची वेळ येईल व शासनाची कायदा पालनाची वैधानिक जबाबदारी असून देखील ते पार पाडू शकत नसल्याची लाजिरवाणी वेळ आली आहे त्याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसेल.
 डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com,
सिताराम, रूख्मिणी नगर, अशोका मार्ग, नाशिक ४२२०११ ९४२२२६३६८९, ८३९०३८८९६३