Tuesday 25 September 2012

लासलगावच्या निमित्ताने,


लासलगावच्या निमित्ताने,
भारतीय शेतमाल बाजारात परकीय गुंतवणूकीच्या परिणामाबाबत चर्चा चालू असतांनाच भारतीय शेतमाल बाजार हा कसा एकाधिकारी प्रवृत्तींच्या ताब्यात गेला आहे याची एकेक उदाहरणे बाहेर येऊ लागली आहेत. कदाचित या परकीय गुंतवणुकीमुळे पुढे येणा-या संकटांची काळजी करीत यातला प्रत्येक घटक आपल्याला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात दिसतो आहे.
लासलगाव ही भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील कांद्यांची प्रमुख बाजार पेठ मानली जाते. या बाजार पेठेतून देशांतर्गत व निर्यातीची उलाढाल होत असते. या बाजार समितीत सततच्या वाढत्या आवकीनुसार व बदलत्या बाजाराच्या गरजेनुसार काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्याला विरोध म्हणून व्यापा-यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतला व बाजार समितीत आलेल्या कांद्याचे लिलाव बंद पाडले. अर्थातच अचानक झालेल्या या प्रकाराने शेतकरी खवळला व रस्त्यावर आला. कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन प्रशासनालाही सुचेनासे झाले.
झालेल्या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटना, बाजार समितीचे व्यवस्थापन, तालुका निबंधक, तहसीलदार व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक बाजार समितीच्या कार्यालयात बोलावण्यात आली. या बैठकीतून काही गोष्टी पुढे आल्या त्यावरून सा-या शेतमाल बाजारात परंपरांचा आधार घेत अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या असून कायद्याला आव्हान देत सा-या शेतक-यांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे.
त्याचे झाले असे की निर्यातीच्या व बाहेरच्या काही व्यापा-यांच्या गरजेनुसार शेतक-यांनी बाजारात कांदा आणतांना प्रतवारी करून गोणीत भरून आणावा म्हणजे बाहेरच्या व्यापा-यांचे वेळ व श्रम वाचून शेतक-यांना दोन पैसे वाढीव भाव देता येईल असा निर्णय घेण्यात आला. हा गोणी विभाग स्वतंत्र असून त्याचे खरेदीदार व्यापारीही वेगळे आहेत. याला पूर्वीच्या व्यापा-यांचा विरोध असून नवीन व्यापा-यांना व्यापार करण्याची परवानगीच देऊ नये या हट्टापोटी जून्या व्यापा-यांनी सारी बाजार पेठ बंद पाडली आहे. यातला एक गंभीर प्रकार म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खरेदी करणा-या सा-या व्यापा-यांची संघटना असून या सा-या बाजार समित्यातून कोणाही नव्या व्यापा-याला खरेदीची परवानगी देऊ नये असा ठरावच या संघटनेने केला आहे. इतर बाजार समित्या हा ठराव इमाने इतमाने पाळत असतांना लासलगावच्या बाजार समितीने आपल्या वाढत्या व्यवहारानुसार व्यापा-यांची संख्या वाढवणे व बाहेरच्या बाजारानुसार सुधार अमलात आणण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेतलेले दिसतात. पूर्वी बाजारात येणारा माल व त्याचे प्रमाण यानुसार व्यापा-यांची जी २०० ची संख्या होती ती आता १२५ येऊन व आता बाजारात येणा-या मालाचे प्रचंड प्रमाण बघता खरेदीदारांच्या संख्येत वाढ होणे हे शेतक-यांच्या व बाजाराच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र नवीन व्यापा-यांना, जे त्यांचेच भाऊबंद आहेत, त्यांना विरोध करण्याचे काम जूने व्यापारी करीत आहेत. शोषणाचे हत्यार आमच्याच हाती रहावे व त्याचे फायदेही आम्हालाच मिळत रहावेत अशी ही मानसिकता आहे. ज्या शेतक-यांसाठी या बाजार समित्या स्थापन झाल्या आहेत त्यावर खरे अधिपत्य व्यापारी, हमाल व माथाड्यांचेच आहे हे या उदाहरणावरून दिसून येते.
अजून तरी या समस्येवर तोडगा निघाला नसल्याने हा तिढा कायम आहे व येणारा काही काळ तरी शेतक-यांच्या दृष्टीने गैरसोईचा ठरणार आहे. कारण मोकळा कांदा विभाग या व्यापा-यानी संपावर जात बंद केला असून शेतक-यांनी गोणीबंद कांदा आणल्यास त्याचा लिलाव होऊ शकेल अशी आजची परिस्थिती आहे. काही काळ शेतक-यांनी परिसरातील इतर बाजार समित्यांचा आसरा घ्यावा असेही होऊ शकेल. हा सारा बाजार खुला होईपर्यंत शेतक-यांच्या नशिबात काय काय लिहून ठेवले आहे हे पहाणे आपल्या हाती आहे.
                                         डॉ.गिरधर पाटील.

 

No comments:

Post a Comment