Wednesday, 2 December 2015

शेतमाल बाजार सुधार



शेतमाल बाजार सुधार
कारणे, उपाय व अंमलबजावणीतील आव्हाने
                सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो व आभार मानतो यासाठी की शेतमाल बाजाराच्या गंभीर परिस्थितीबाबत संबंधित घटकांना विश्वासात घेऊन त्यावर विचार विनिमय करण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणा-या कार्यकर्त्यांची समिती नेमण्यात आली. आता या संधीचा फायदा ही समिती वा शासन कशाप्रकारे घेते यावर या प्रयत्नाचे यशापयश ठरणार आहे.
                माझ्या या विषयाच्या आजवरच्या आकलनानुसार मी हे मु्द्दे मांडत आहे. ते चर्चेसाठी पूर्णपणे खुले आहेत. स्थलकालानुसार काही बाजार समित्यांतील परिस्थिती भिन्न असू शकते मात्र धोरणात्मक विचार करतांना यातील सर्व घटकांचे व्यापक हित लक्षात घेऊन बाजार या संकल्पनेला काय अपेक्षित आहे याचा प्रामुख्याने विचार केला आहे. कुठलाही बदल हा नकोसा असतो व प्रस्थापितांना तर तो नकोच असतो. मात्र होणारा बदल सा-यांना हितकारक ठरणार असेल तर तो सा-यांनी खुलेपणानी स्विकारावा हीच एक अपेक्षा.
बाजार – एक संकल्पना,
बाजाराचा न्याय्यता हा एक महत्वाचा गुणधर्म असतो. उत्पादक व उपभोक्ता हे बाजाराचे मुख्य घटक. त्यांच्यातील देवाण घेवाणीतील न्यायता जोपासत या दोन्ही घटकांचे हित साधले जात असते. बाजारातील इतर सारे अनुषांगिक घटक या बाजारातील व्यवहारांचे पावित्र्य जपायला कटिबध्द असावेत. बाजार सुरळीत चालण्यासाठी सक्षम अशा कायदा व सुव्यवस्थेचीही गरज असते. हा सरकार व बाजाराचा संबंध सोडला तर सरकारचा बाजारात कुठलाही हस्तक्षेप नसणे अभिप्रेत असते. या सा-या कसोट्यांवर आजचा भारतीय शेतमाल बाजार बघितला तर यातील कुठलेही निकष पूर्ण होत नसल्याने तो आदर्श तर सोडा, किमान बाजार म्हणण्याचाही प्रश्न पडावा.
बाजारात निर्णयाचे स्वातंत्र्य हा एक कळीचा मुद्दा असतो. ही निर्णय प्रक्रिया अत्यंत निखळ पध्दतीने पार पाडली जावी. यातील  मागणी-पुरवठा या सारख्या नैसर्गिक ताणतणावाचा भाग सोडला तर इतर कुठल्याही मार्गाने विक्रेता वा खरेदीदारावर आपल्या भूमिका पार पाडतांना बंधन, दबाब वा सक्ती असू नये. असेच स्थळ, काळ व निकड या घटकांचाही परिणाम दोन्ही घटकांवर समानतेने होत त्याचे कुठलाही असंतुलन एकाद्या घटकाला अन्यायकारक ठरू नये. किंवा बाजारातील परिस्थिती एकाद्या घटकाला अनुकूल ठरत त्याचवेळी ती दुस-या घटकावर अन्यायकारक होईल अशी धोरणे सरकार नामक व्यवस्थेने टाळत व्यावहारिक नैतिकतेचे पालन होईल अशी कायदा व सुव्यवस्थेची काळजी घ्यावी. एकंदरीत सरकारने निष्पक्षपातीपणे बाजारात वावरणे फार गरजेचे आहे.
आपला आजचा शेतमाल बाजार, 
दुर्दैवाने आजच्या आपल्या शेतमाल बाजारात बाजार या संकल्पनेचे मूलभूत निकषही पाळले जात नसल्याने त्यात अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत. या विकृतींवर सरकारला योग्य ती उपाय योजना करण्यात अपयश आल्याने उत्पादक शेतकरी व उपभोक्ता ग्राहक या दोन्हीचे नैसर्गिक हित बाधित होत आहे. कृषि उत्पन्न खरेदी विक्री नियमन कायदा हा मुळातच आज कालबाह्य झाला असून त्यातील राक्षसी तरतुदींचा गैरफायदा घेत काही एकाधिकार तयार झाले असून सारा शेतमाल बाजार, निर्यात व प्रक्रिया उद्योगावर त्याचे अनिष्ट परिणाम होत राष्ट्रीय उत्पन्नाचीही हानी होत आहे.
आज या कायद्यातील सुधाराबाबत सरकार अत्यंत नकारात्मक भूमिकेत आहे. केंद्राने याबाबत नवा कायदा आणून देखील राज्य सरकारे त्याच्या अमलबजावणीबाबत गंभीर नाहीत. एकंदरीत काहींच्या फायद्याची ठरणारी ही व्यवस्था अशीच चालू रहावी अशी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची इच्छा दिसते. या सा-या मगरमिठीतून शेतकरी व ग्राहकांचे हित कसे जोपासायचे हा मोठा यक्षप्रश्न झाला आहे.
आज राज्यातील शेतमाल बाजाराची अवस्था बघता ज्या शेतीमालाच्या न्याय्य व पारदर्शक विपणनाच्या उद्देशासाठी ही सारी यंत्रणा उभारण्यात आली नेमका तोच नेमका हरवला असून देशाच्या अर्थव्यवस्थेतील एका प्रमुख घटकाच्या भवितव्याच्या प्रश्नाबरोबर आज विपन्नावस्थेत जगणा-या शेतकरी व आपल्या तुटपुंज्या उत्पन्नात गुजराण करणा-या ग्राहकांच्या जीविताच्या हक्कावरच टाच आल्याचे दिसते. अत्यंत दूर्लक्षित व गैरव्यवस्थापनाने दूरवस्थेला आलेल्या या बाजारात आवश्यक असणा-या सुधारांच्या जंत्रीपेक्षा त्यांच्या अंमलबजावणीबाबत गहन प्रश्न निर्माण झाले आहेत. कारणे काही का असेनात मात्र ही परिस्थिती आहे तशीच चालू ठेवण्यात काही घटकांचा आग्रह तणावाचे मुख्य कारण असून त्यात मुख्यत्वे बाजार समित्यांची कार्यपध्दती, त्यात कार्यरत असणारे काही असामाजिक घटक व त्यावर आजवर शासनाची नियंत्रक म्हणून अपयशी ठरलेली कारकीर्द यांचा प्रामुख्याने विचार करता येईल. आता आलेल्या नव्या शासनाने यावर अभ्यास, त्यावरून अचूक निदान व कठोर कारवाई या मार्गांचा अवलंब केल्यास यातील सर्व घटकांचा वैध अधिकार अबाधित ठेवत एक न्याय्य व पारदर्शक बाजार व्यवस्था निर्माण करता येईल.
बाजार समित्या – रचनात्मक बदल, 
आज राज्यातील शेतमाल बाजार हा सहकारी बाजार समित्यांमार्फत नियंत्रित केला जातो. या बाजार समित्या कायद्यानुसार स्थापित होत असल्या तरी त्यात शेतक-यांचे प्रतिनिधीत्व योग्य त्या मात्रेने व पध्दतीने पडत नसल्याने प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या या व्यवस्थेत काही चुकीचा उद्देश ठेवणा-या घटकांचा प्रवेश सुकर झाला आहे. आज या बाजार समित्यात कर रूपाने रोज रोखीत प्रचंड महसूल गोळा करण्यात येत असून त्याच्या हिशोब व विनियोगाबाबत कुठलेही प्रभावी नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. बाजार समितीत शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून जे निवडले जातात ते या बाजारात शेतमाल विक्रीला आणणारे सर्वसामान्य शेतकरी नसून ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायट्यांचे संचालक असतात. ग्रामीण भागातील या घटकांमधील आरक्षित वर्गाचे प्रमाण लक्षात घेता महिला, जातीय व इतर घटकांचा ज्यांचा उत्पादक शेतकरी व शेतमाल बाजाराशी तसा सरळ सबंध नसतो. एका वेगळ्या व्यवस्थेतील व वेगळ्या उद्दिष्टासाठी निवडलेल्या प्रतिनिधींचा बाजार समितीच्या निर्मितीसाठी केलेला हा गैरवापरच असून काही चाणाक्ष राजकारण्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा फायदा घेतलेला दिसतो. अशा प्रकारचे मतदान हे मर्यादित स्वरूपाचे असल्याने त्यात मते विकत घेऊन निवडून येणा-यांचे फावते व काही गुंतवणूकीवर एवढ्या आर्थिक उलाढालीवर नियंत्रण मिळवता येत असेल तर ठरवून या बाजार व्यवस्थेत प्रवेश मिळवता येतो. एवढेच नव्हे तर मिळणा-या अधिकारांचा गैरवापर करत या बाजारात आपले स्वार्थ अबाधित ठेवण्याची कार्यपध्दती विकसित करण्यात येते व त्यातून आजच्या सारखे अराजक निर्माण होऊन ज्यांच्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश होता तो सफल करण्यात अपयश येते.
उपाय, 
१. शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून जे शेतकरी या बाजारात माल विक्रीला आणतात ते किंवा ज्यांच्या नावाचा सातबारा आहे अशांचा स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करून त्यातून शेतक-यांचे प्रतिनिधी निवडून यावेत.
२. बाजार समिती ही केवळ व्यवस्थापकीय संस्था ठेवत, भांडवली गुंतवणूक, मालमत्तेबाबतचे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार काढून त्यांचेकडे फक्त बाजार आवाराचे व्यवस्थापनाची जबाबदारी  ठेवावी.
३. बाजार समितीवरील नियंत्रणाची जबाबदारी निश्चित करावी. पणन व सहकार खात्याचे बाजार समितीच्या कारभारावर सक्षम नियंत्रण हवे व गैरप्रकारांवर वेळीच कारवाई झाली तर एवढ्या विकोपाला गोष्टी जाणार नाहीत. आज जिल्हा उपनिबंधक व पणन मंडळाच्या अधिका-यांना हाताशी धरून अनेक गैरप्रकार केले जातात. हे गैरप्रकार न्यायालयात सिध्द होऊनही उचित कारवाई न झाल्याची गंभीर दखल पणन व सहकार खात्याने आता घ्यायला हवी. दहा दहा वर्षे बाजार समित्यांचे हिशोब वा लेखापरिक्षण न झाल्याची उदाहरणे आहेत.
४.एवढेच नव्हे तर या बाजार समित्यांमध्ये येणा-या शेतक-यांच्या सुरक्षितेचाही प्रश्न फार गंभीर झाला आहे. शेतमालाच्या वजन मापाचे कायदे कुठे पाळले जात नाहीत. त्याच्या शेतमालाची राजरोसपणे होणारी चोरी बाजार समित्या थांबवू शकलेल्या नाहीत. त्याच्याकडील पैशांची लूटच नव्हे तर या विरोधात आवाज उठवणा-या शेतक-यांवर जीवघेणे हल्ले झाल्याची अनेक उदाहरणे जाहीर झालेली आहेत. यावर शेतक-यांनी मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारींबाबत आयोगाने बाजार समित्या, सहकार व पणन खात्यावर ताशेरे ओढले असून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी बाजार समित्यांचीच असल्याचे आपल्या निकालात म्हटले आहे.
५. ताबडतोबीने करता येण्यासारखा उपाय म्हणजे ज्या बाजार समित्यात कायद्याचे पालन होत नाही, ज्यात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत, ज्यांचे आर्थिक व्यवहार वा लेखापरिक्षणात चूका झालेल्या आहेत अशांना बरखास्त करून त्यावर प्रशासकीय नियंत्रण आणावे व शासनाची वैध कार्यप्रणाली प्रस्थिपित करावी.
६. प्रशासक म्हणून या विषयातील माहितगार व तज्ञ अधिका-यांची निवड करावी. सुदैवाने आज उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासनानेच प्रमाणित केलेल्या सचिव पॅनेल मधील उमेदवारांची मदत घ्यावी कारण या सा-यांचा शेतमाल बाजार कायदा व व्यवस्थेचा अभ्यास उत्तम असल्याचे दिसून आले आहे.
बाजार समित्या – अधिकार व कार्यपध्दती, 
बाजार समित्या या सहकार कायद्यांन्वये स्वायत्त संस्था म्हणून गणल्या जातात. निवडून आलेले संचालक मंडळ सचिवांच्या साह्याने कारभार बघतात. या निवडून आलेल्या संचालकांचा बाजार या संस्थेबाबतचा अभ्यास काहीच नसल्याने त्यांचा गैरवापर होण्याची उदाहरणे दिसतात. सदरचा कारभार हा वैध व कायद्यानुसार करण्याची जबाबदारी सचिवांवर येते. आर्थिक व्यवहाराला त्यांची संमती आवश्यक असल्याने त्यांच्याकरवी नियंत्रण करणे सोपे जाऊ शकते.  केंद्राच्या एका अभ्यास गटाला हे सचिव प्रशिक्षित वा बाजार व्यवस्थेतील तज्ञ नसल्याने बाजारात अनेक गैरप्रकार स्थापित होत त्यांना परंपरा वा प्रथांच्या नावाखाली समर्थन प्राप्त होत असल्याचे लक्षात आले. त्यात शेतक-यांचे शोषण करणा-या वजनमापाच्या, भावाच्या व सुरक्षिततेच्या अनेक समस्या निर्माण झाल्याने राज्य शासनाने प्रशिक्षित व तज्ञ सचिवांचे पॅनेल तयार करून त्यांची नियुक्ती या बाजार समितीत करण्याविषयीचा प्रस्ताव करून त्यानुसार राज्यात सचिव पॅनेलची निर्मितीही झाली. त्यापैकी काही सचिवांची नियुक्ती झाली असून त्या बाजार समित्यांतील कारभार सुधारल्याचे सिध्दही झाले आहे. मात्र ही सुधारणा तांत्रिक मुद्यावर न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्यात आली व इतर बाजार समित्यांतील सचिवांच्या नेमणुकांवर स्थगिती आणण्यात आली. राज्य सरकारने यावर कायदेशीर मत घेऊन ही बंदी उठवावी व तज्ञ व प्रशिक्षित सचिवांना या बाजार समित्यामध्ये कार्यरत करावे.
शेतमालाची अनैसर्गिक कोंडी, 
आज प्रचंड प्रमाणात उत्पादित होणारा शेतमाल ग्राहकांपर्यत किरकोळ बाजारात पोहचण्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करीत या शेतमालाच्या खरेदीचे अधिकार सिमित करण्यात आले असून त्यायोगे या यंत्रणेची खरेदी क्षमता गरज नसतांना संकुचित करण्यात आली आहे. परवाना देण्याचे अधिकार वापरत या बाजारात स्पर्धेसाठी पुरेसे खरेदीदार येऊ दिले जात नाहीत त्यामुळे शेतमालाचे भावच नव्हे तर खरेदी करायची किंवा नाही असे गंभीर निर्णय घेण्याचे अधिकार काही विशिष्ठ घटकांकडे एकवटले आहेत. भावाचे तर जाऊ द्या केवळ विक्री न झाल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल घरी नेणे परवडत नाही म्हणून शेतक-यांना रस्त्यावर फेकून द्यावा लागल्याची अनेक उदाहरणे माध्यमातून सातत्याने प्रसिध्द होत असतात. या गैरप्रकाराची जबाबदारी घेण्यासाठी ना तर अधिकृत खरेदीदार ना तर बाजार समित्या पुढे येतात. त्यांच्यावर नियंत्रण असणारे पणन मंडळ व सहकार खातेही याबद्दल आपला काही संबंध असल्याचे दाखवत नाही.
केवळ बाजार समित्यांना शेतमाल विक्रिच्या प्रक्रियेत विविध सेवा देणा-या घटकांना परवाने देण्याचे अधिकार असल्याने ते अशा विशिष्ट हेतुसाठी वापरले जातात. खरेदीदार, आडते, दलाल, मापारी, हमाल यांना परवाने देण्याचे अधिकार हे पारदर्शक न रहाता त्याबाबत अनेक तक्रारी आहेत. या सर्वात महत्वाचा भाग खरेदीदार व्यापा-यांच्या परवान्याचा असतो. एकदा सदरचा परवाना मिळाला की शेतमालाच्या लिलावात भाग घेऊन शेतमाल खरेदी करता येतो. शेतक-यांना मिळणारा शेतमालाचा भाव हा सर्वस्वी या लिलावात भाग घेणा-या व्यापा-यांवर अवलंबून असतो.
आज या बाजारात खरेदीसाठी प्रतिक्षेत असलेले अनेक प्रामाणिक व्यापारी, निर्यातदार, प्रक्रिया उद्योग या बाजारात खरेदीसाठी उत्सुक असून त्यांना खरेदीसाठी स्वतंत्र परवानगी न मिळाल्याने प्रस्थापित खरेदीदारांकडेच जावे लागते. यात शेतमालाची बाजारातील प्रत्यक्ष किंमत व शेतक-यांना मिळणारी किंमत यात प्रचंड तफावत दिसते व ती केवळ खरेदीच्या एकाधिकारामुळे निर्माण झाल्याचे दिसते. यातून प्रचंड अवैध काळा पैसा तयार होत असून बाजार समित्यांचे व्यवस्थापन, राज्याचे प्रशासन यांना प्रभावित करीत राजरोसपणे चालू असल्याचे दिसते. यातून राज्याचा महसूल व इतर करांबाबतचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
                अ. आज शेतमालाच्या वाढत्या उत्पादनानुसार त्याप्रमाणात बाजार समित्यांतील मालाची आवकही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र बाजार समित्यातील खरेदीदार व्यापा-यांची संख्या व त्यावर आधारलेली त्यांची खरेदीची क्षमता त्याप्रमाणात वाढू दिलेली नाही. यात काही खरेदीदारांचा एकाधिकार वाढीला लागून विक्रेता शेतकरी यांचे परावलंबित्व वाढते कारण त्याच्या आपला माल विकण्याच्या व त्याला उचित भाव मिळण्याच्या संधी यामुळे संकुचित होतात. दुसरीकडे हा शेतमाल बाजारात विकणा-या विक्रेत्यांनाही मालासाठी या एकाधिकारी व्यापा-यावरच अवलंबून रहावे लागते. या दुहेरी मनमानीमुळे खरेदीदार खरेदी करतांना आपल्या एकाधिकाराचा वापर करीत स्पर्धा निर्माण न होऊ देता शेतक-यांना किमान भाव देतो व त्याच वेळी आपल्याशिवाय बाहेर कुणाला शेतमाल मिळणार नाही याची काळजी घेत इतर विक्रेते व किरकोळ बाजारात चढ्या भावाने तो माल विकतो. अशा प्रकारच्या बाजारावर प्रभुत्व मिळवलेले व्यापा-यांचे गट सा-या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कार्यरत असून शेतमालाची कोंडी करीत त्याला त्याच्या विहित हक्कांपासून वंचित करीत आहेत. यासाठी बाजारात जेवढे खरेदीदार वाढतील तेवढे वाढवावे व त्यांत स्पर्धा निर्माण करीत पारदर्शक पध्दतीने विक्री करावी. येईल त्याला परवाना व रोखीने व्यवहार करणा-या खरेदीदारांना कुठले बंधन न ठेवता प्राधान्य द्यावे व रोखीचा बाजार कसा वाढेल व स्पर्धा कशी आणता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे.
ब. निर्यातदार व प्रक्रिया गटांना वेगळे कक्ष देऊन ज्या शेतक-यांनी प्रतवारी केलेला माल आणला असेल त्यांना अधिक भाव मिळण्यासाठी उद्युक्त करावे. बाजार समितीत येणा-या मालाची घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ असे कक्ष करावेत व त्या मालाची विक्री विभागत ठराविकच खरेदीदारांवर पडणारा खरेदीचा ताण कमी करता येईल. वेगवेगळ्या गटातील खरेदीदारांना आपल्या गरजेनुसार सरळ शेतक-यांकडून माल घेता येईल व किरकोळ बाजारातील नफा शेतक-यांपर्यंत पोहचवता येईल.
क. बाजार समिती व्यतिरिक्त सा-या सौद्यांना वैध ठरवावे व त्याच्या अटी शर्थी देणारा व घेणारा यांना परस्परात ठरवू द्याव्यात. आज बाजार समित्यांच्या भौगोलिक स्थानानुसार विक्रीसाठी  प्रत्यक्ष न्यावा लागतो. या शेतमालाच्या विनियोगाचे ठिकाण प्रत्यक्षात वेगळे असते. यात शेतमाल वाहतूकीच्या खर्चाच्या ताणाबरोबर नाशवंत मालाच्या हाताळणीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता शेतक-यांना काही एक कारण नसतांना नुकसानीचे ठरते. बाजार समित्यांबाहेर होणा-या व्यवहारांमुळे हे नुकसान टळून शेतक-यांना दोन पैसे अधिकचे मिळू शकतील.
ड. खुद्द बाजार समितीत देखील एक मुक्त द्वार विभाग असावा व त्यातील दर बघून शेतक-यांना तेथे माल विकण्याची मुभा असावी. त्यात रोखीच्या व्यवहाराची अट घालता येईल.
ई. परराज्यातील वा परदेशातील खरेदीदारांसाठी पणन मंडळाचे एक मार्गदर्शक कार्यालय प्रत्येक बाजार समितीत असावे. शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाची गुणवत्ता व दरांची अद्ययावत माहिती त्यात असावी व तसे दर देणा-या खरेदीदारांची व शेतक-यांची भेट घडवत व्यवहार होऊ शकतील.
३. या बाजारात इतर अनुषांगिक सेवा देणा-यांसाठी परवाना पध्दत असू नये. ज्यांची सेवा उत्तम व चोख असेल अशा सेवेक-यांची निवड करण्याचा अधिकार शेतक-यांना हवा. एकदा शेतक-यांने शेतमाल बाजार समितीत आणला की या सेवेक-यांचा सेवा देण्याचा हक्क प्रस्थापित झाला असे होऊ नये. कुणा सेवेक-यांची सेवा आवश्यक आहे अथवा हे शेतक-यांने ठरवल्यानंतर त्याला उपलब्ध असलेल्या सेवेक-यांतून निवड करता यावी. त्याबाबतचे दर दोघांच्या गरजेनुसार ते आपापसात ठरवतील. यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी बाजार समितीची असेल.
४. आजच्या या आधुनिक जगात आडत ही संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. संपर्क व दळणवळणाची संसाधने व प्रगत तंत्रज्ञान यामुळे कधीकाळी या सोई नसल्याने वापरात आलेली ही प्रथा व तिची सक्ती शेतक-यांवर अन्यायकारक ठरते. बाजार समित्यांतील खरेदीदारांची संख्या व खरेदी क्षमता वाढवणे व रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य देणे हा यावरचा उपाय. यात आजचे आडते आपल्या खरेदीदारासाठी माल इतर खरेदीदारासारखा खरेदी करू शकतील मात्र त्याला आडतीसारख्या कपाती करता येणार नाहीत.
५. यात बाजार समिती कायद्यात विषद केलेली साठवणूक व्यवस्था बाजार समित्या करू शकलेल्या नाहीत म्हणून अजूनही या प्रथेचे अस्तित्व जाणवते आहे. यावरचा उपाय म्हणून केंद्राने वखारीचा कायदा पारित केला असून बाजार समिती वा इतर मान्यताप्राप्त वखारीत आपला माल शेतक-यांनी ठेवल्यास त्या पावतीला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चा दर्जा प्राप्त होत त्यावरच्या शेतमालाच्या बाजार मूल्याच्या ७५ टक्के रक्कम शेतक-यांला बँका देऊ शकतील व त्याची माल विकण्याची निकड पूर्ण होऊ शकेल. आज ही सुविधा कार्यान्वित नसल्याने आडतीसारख्या सेवा वापरात आहेत.
आज आडत कोणाकडून किती घ्यायची हा कळीचा प्रश्न नसून शेतक-यांच्या हातात त्याच्या मालाचे उचित मूल्य पडते की नाही हे पहाणे महत्वाचे आहे. आडत कोणाकडूनही वसूल झाली तर ती आडते व्यापारी आपल्या नफ्यातून देणार नाहीत त्याचा बोजा शेवटी उत्पादक वा ग्राहक यांच्यावरच पडणार आहे. तेव्हा अशा सापळ्यात न अडकलेले बरे. आडत कितपत ग्राह्य वा तिला काही योग्य पर्याय देता येतात का हे पहाणे महत्वाचे ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत बाजार समित्यांच्या बळकटीकरणाचा प्रयत्न आत्मघातकी ठरेल. फार तर त्या सुनियंत्रित कराव्यात असे म्हणता येईल. आपले विहित कर्तव्य बजावण्यात त्या यशस्वी झाल्या तर त्या आपोआपच बळकट होतील सरकारच्या बळकटीकरणाची त्यांना काही एक गरज राहणार नाही. नियंत्रणे मग ती बाजार समिती आवारातील असोत वा बाहेरची, बाजार व्यवस्थेला मारकच ठरतात. शेवटी देवाणघेवाणीच्या अटी या विकणारा व घेणारा यांच्या हिताच्या असल्या तर काल स्थान वा परिस्थिती यांना फारसे महत्व रहात नाही. त्यांना त्याच्या विक्रीचे वा खरेदीचे स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपले ध्येय असले पाहिजे.
खरे म्हणजे आज उपस्थित करण्यात येणारे आडत वा हमालतोलाईच्या दरांचे प्रश्न हे बंदिस्तपणाच्या आजाराची लक्षणे आहेत. मूळ आजाराला खुलेपणाने हात घातला तर ते सहजपणे सुटू शकतात. आजवर अनिर्बंधपणे उपभोगलेल्या एकाधिकाराचे फायदे उपटण्याचे व्यसन आता जनजागृती, कायद्यातील बदल वा बदललेल्या सरकारमुळे गमवावे लागण्याच्या भितीमुळे हे सारे घटक सजग झाले असून आपल्या ताकदीवर हे सारे बदल नाकारणाच्या प्रयत्नांचा एक भाग ठरू पहाताहेत. आजच्या या विचित्र कोंडीमुळे शेतकरी, ग्राहक व सरकार समजत असून वा अधिकार असूनही काही करू न शकणा-या परिस्थितीत सापडले आहेत. त्यामुळे हे सारे प्रकरण घिसडघाईने न हाताळता सावकाशपणे एक निश्चित असा कार्यक्रम आखून, तो कठोरतेने राबवला तरच हे ऑपरेशन यशस्वी होऊ शकेल.
इतर आक्षेप
फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या देशातील औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने शेतमाल बाजाराच्या सुधारासाठी बाजार समित्यांचा कायदा रदबादल करण्याची जाहीर मागणी केली आहे. किरकोळ किराणा क्षेत्रात येऊ घातलेल्या परकीय गुंतवणुकदारांनीही या व्यवस्थेबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. देशातील शेतमाल घाऊक उद्योग,  निर्यातदार व प्रक्रिया उद्योजक यांनीही या बाजारात खुलेपणाची मागणी केली असून खरेदीवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे.
कॅगने आपल्या आर्थिक सर्वेक्षणात जाहीर केलेले कृषि उत्पादनाचे आकडे व या बाजार समित्यांतून झालेली त्याच्या विक्रीची नोंद यात प्रचंड तफावत असून बाजार समित्यांच्या कामकाजाबाबत प्रश्न निर्माण करणारे आहेत. मात्र राजकीय दबाबामुळे या सा-या बाजार समित्यांना संरक्षण दिले जात असून एक संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.
मॉडेल एक्ट
शेवटचा एक महत्वाचा मुद्दा हा मॉडेल एक्टसंबंधी आहे. आजवर आम्ही बाहेरच नव्हे तर विधानसभेत देखील जाहीर झालेले ऐकत होतो की महाराष्ट्र शासनाने हा कायदा स्विकारलेला आहे. याबाबतचे वास्तव असे आहे की खाजगी बाजार वा काँट्रॅक्ट फार्मिंग सारखी काही कलमे घालून आपण जूनाच कायदा त्यातील अनिष्ट तरतुदींसह तसाच ठेवला आहे. राज्यातील शेतक-यांची ही घोर फसवणूक असून केंद्राने एवढा अभ्यासपूर्वक केलेल्या कायद्याचे फायदे राज्यातील शेतक-यांना उपभोगता येत नाहीत. याचे साधे उदाहरण म्हणजे हा कायदा जर आपण स्विकारला असता तर त्यातील आडतीच्या तरतुदीनुसार आडत हा वादाचा मुद्दाच झाला नसता. या मॉडेल एक्टच्या कलम ४१-४ नुसार आडत्याला बाजार समितीने विहित केलेल्या दराने आडत खरेदीदाराकडूनच वसूल करता येईल. शेतक-यांला कुठलीही कपात न करता त्याला पैसे द्यावेत असे म्हटले आहे. राज्य शासनाला अजूनही हा कायदा स्विकारून त्याचे फायदे सर्वांना देता येतील.
हमीभावाची परवड, 
शेतमालाला हमीभाव मिळवून द्यायची मोठी जबाबदारी बाजार समित्यांवर असते. बाजारात शेतमालाला रास्त भाव नसतात तेव्हा शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून किमान हमी दराने बाजारात व्यवहार व्हावेत असा कायदा आहे. मात्र खरेदी करण्यात येणा-या मालाच्या प्रतवारी व गुणवत्तेबाबत अनेक किचकट अटी आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात अशा अटींचे पालन करणे कठीण असते व त्यांचा भ्रष्टाचारी वापर व्हायची उदाहरणेही आहेत.  अशी खरेदी करण्याची  जबाबदारी ज्या खरेदी विक्री संघावर आहे त्यांच्यावर बाजार समित्या वा पणन मंडळाचे थेट नियंत्रण नाही. एक तर हे सारे खरेदी विक्री संघ एकतर भ्रष्टाचाराने डबघाईस आले आहेत वा त्यानी खरेदी केलेल्या मालाचे पैसे मिळतीलच याची निश्चिती नसल्याने शेतकरी त्यांना माल द्यायला धजावत नाहीत. नाफेडसारख्या संस्थांनाही बाजार समित्यांशी जोडण्यात आलेले नाही. शेवटी गरजवान शेतक-यांना पर्याय न उरल्याने बाजार समितीत जो काही भाव मिळेल तो घ्यावा लागतो व कमी भावात शेतमाल खरेदी करण्याचे एक प्रभावी हत्यार आपसूकच खरेदीदारांच्या हाती लागते.
या शेतमाल बाजारातील सारी परिस्थिती एवढ्या विकोपाला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे नियंत्रणाचा अभाव. या बाजार समित्या सहकार कायद्यान्वये स्थापित असल्यामुळे सहकार खाते म्हणजे जिल्हा उप निबंधक यांना कारवाईचे अधिकार असून देखील सारी कारवाई पणन खात्यावर ढकलली जाते. पणन ती परत सहकार खात्यावर टोलवून स्वतः नामनिराळे रहात या गैरप्रकारांना एकप्रकारे अभयच मिळत जाते. त्यामुळे सोकावलेल्या व कारवाईला मुळीच भिक न घालणारे घटक बेफाम झाले असून शासनाचे अधिकृत आदेशही न जुमानता बाजार बंद पाडण्याची धमकी देत सा-या निष्पाप घटकांना वेठीस धरत आहेत. या सा-या विचित्र परिस्थितीमुळे यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया अत्यंत बिकट झाली असून सा-या व्यवस्थेचा व कायद्याचा सखोल अभ्यास करून टप्पाटप्प्प्याने कारवाई करणारी एक स्वतंत्र यंत्रणा नेमून त्यावर परिणामांची जबाबदारी सोपवत पार पाडावी लागेल. अन्यथा एकंदरीतच बाजारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहे ती परिस्थिती तशीच पुढे चालू ठेवण्याची वेळ येईल व शासनाची कायदा पालनाची वैधानिक जबाबदारी असून देखील ते पार पाडू शकत नसल्याची लाजिरवाणी वेळ आली आहे त्याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसेल.
 डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com,
सिताराम, रूख्मिणी नगर, अशोका मार्ग, नाशिक ४२२०११ ९४२२२६३६८९, ८३९०३८८९६३

Sunday, 6 September 2015

अगाचि घडलेचि नाही ?




शेतक-यांनी आता राजकारण करावे, असा सल्ला निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांनी दिला आहे (दै लोकसत्ता २९ एप्रिल). दर दहा वर्षात शेतक-यांचे राजकारण एक पाऊल मागे जाते हे त्यांचे निरिक्षण, म्हणजे चौधरी चरण सिंह व टिकैत यांच्या पन्नास वर्षापूर्वीच्या आंदोलनाशी संबंधित असल्याचेही अधोरेखित झाले आहे. मात्र त्याच दरम्यान केवळ भारतातच नव्हे तर सा-या जगात शेतकरी आंदोलनाला एक नवे आर्थिक परिमाण देत दैववादी शेतीला एक व्यावहारिक चेहरा देणारे व राजकारणातील सारे उच्चांक मोडणारे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन ते सोईस्कर विसरलेले दिसतात. शरद जोशींचा साधा उल्लेखसुध्दा झेपवत नाही हे आत्ममग्न साहित्य संमेलनात सिध्द झाले असतांनाच योगेंद्र यादवांसारख्या राजकारणाच्या अभ्यासकानेही त्याच मार्गाने जावे यातही योगायोगच समजला पाहिजे.  याच आंदोलनाच्या यशाची इतर परिमाणे कदाचित यादवांना तो विचार समजून कळाली तर ठीकच आहे, अन्यथा त्या काळातील ५-५ लाखाच्या सभा व शेतकरी समाजातील पुरूषच नव्हे तर सा-या बायाबापड्या घरच्या भाकरी बांधून आपल्यावरील अन्यायाविरोधात आंदोलनात उभ्या रहात याचे पुरावे तर सा-या माध्यमांत उपलब्ध आहेत. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात तीन लाख स्त्रिया तीन दिवस ज्या शिस्तबध्द पध्दतीने आपल्या समस्यांचा अभ्यास करत जे काही ठराव मांडत्या झाल्या ते यादवांनी एकदा डोळ्याखालून घालावे म्हणजे शेतकरी राजकारण ज्या उंचीला पोहचले होते त्याचा काहीतरी मागोवा त्यांना घेता येईल. आज शेतीवर ज्या गुणवत्तेचे साहित्य उपलब्ध आहे त्यात शेतकरी संघटनेच्या साहित्याचा उल्लेख कुणालाही टाळता येणार नाही. शेतीचे अर्थशास्त्र व सरकारी धोरणांचा शेतीवरचा प्रभाव हे या विचारांचे मर्मस्थान आहे. माध्यमांत देखील शेतकरी संघटनेच्या विचाराला एक मानाचे स्थान आहे. ज्या विचारावर हे सारे आंदोलन उभे आहे तो शेतक-यांनाच भावला असे नाही तर भारतात व परदेशात अनेकांनी त्याच्या अभ्यासावर डॉक्टरेट मिळवल्या आहेत  हेही यादवांच्या माहितीसाठी देता येईल. डॉ. आशुतोष वर्शेन-हॉर्वर्ड, डॉ. कॅनन लेलेनबर्ग-मेलबोर्न, डॉ. स्टाफन लिंडबर्ग-स्विडन, माईक यंगब्लड-अमेरिका, गेल ऑम्वेट-कॅलिफोर्निया, डॉ.एकनाथ खांदवे-पुणे ही त्या विद्यापीठांसह त्यातली ठळक उदाहरणे. याच बरोबर या आंदोलनाची स्थानिक राजकारण्यानी घेतलेली धास्ती व हे आंदोलन चिरडण्यासाठी केलेली व्युहरचना ही दिल्लीश्वरांनी घेतलेला धसका दाखवण्याइतपत पुरेशी आहे. भले जी राजकीय परिमाणे लावून यादव या आंदोलनाच्या यशापशाची मीमांसा करीत असले तरी त्याचा साधा उल्लेखही त्यांनी करू नये इतके क्षुल्लकही ते नाही.
मी व योगेंद्रजींनी आपच्या धोरण समितीचे सदस्य म्हणून काही दिवस एकत्र काम केले आहे. माझा विषयच शेती असल्याने या नव्या पक्षात शेतीबाबत कुठून सुरूवात करावी याचा प्रश्न पडत असे. एकाद्या विषयात मान्यता मिळवलेल्या विचारवंताच्याही आकलनात कसा एकारलेपणा असतो ते त्याठिकाणी अनुभवण्यास आले. एकंदरीत शेतीबाबत भारतीय राजकारणात आज जे काही चालले आहे त्याबद्दलचा सखोल उहापोह शेतकरी संघटनेने कधीच केला आहे. आज नवी वाटणारी भूसंपादनाच्या बाबतीत शेतकरी संघटनेने मांडलेली भागीदारीची संकल्पना आज प्रत्यक्षात मगरपट्टा व भामा कंस्ट्रक्शन यांनी अंमलात आणली आहे. आज सारे राजकारणी जी भाषा बोलताहेत तिचा उगम शेतकरी संघटनेने मांडलेल्या विचारात दिसून येईल. एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनेच्या सुरूवातीच्या काळात आपल्या सत्ताबळावर शेतकरी संघटनेची मते कशी चूकीची आहेत हे हिरीरीने मांडणा-या दिग्गजांना देखील सारी मांडणी जशीच्या तशी स्विकारावी लागली व आपण कळतनकळत शेतकरी संघटनेवर आपल्या राजकारणासाठी अन्यायच केला हे जाहीररित्या मान्य करावे लागले, यापेक्षा अधिक राजकारण शेतक-यांनी काय करावे याचा यादवांनीच विचार करावयाचा आहे.
आज महाराष्ट्रातच नव्हे तर सा-या भारतातील शेतीला एक नवा चेहरा देण्याचे काम शेतकरी संघटनेने केलेले आहे.  किसान समन्वय समिती ही देशातील शेतक-यांच्या संघटनांची शिखर संस्था वेळोवेळी शेतीसंबंधी प्रश्नांवर अभ्यासपूर्वक निर्णय घेत असते. या निर्णयांचा सरकार दरबारी योग्य तो वापर झाल्याचीही उदाहरणे आहेत. उदारीकरण, खुलीकरण वा खासगीकरण यावर जाहीर भूमिका घेत जागतिक व्यापार संस्थेबाबत निश्चित अशी तात्विक भूमिका सर्वात अगोदर शेतकरी संघटनेने घेतली. डंकेल प्रस्ताव हा शेतक-यांच्या हिताचा आहे ही ९१ साली घेतलेली भूमिका आजच्या शेतीला आलेल्या आर्थिक परिमाणाची द्योतक आहे. एरवी प्रचंड राजाश्रय व संरक्षण लाभलेल्या सहकार क्षेत्राला घरघर लागत ते लयाला जाईल हे ऐशीच्या दशकातले भाष्य आज खरे ठरते आहे. जागतिकीरणात होत असलेली हेळसांड लक्षात घेता डॉलर शेवटी ६० रुपयांपर्यंत जाईल हे भाकितही शेतकरी संघटनेचेच, ते आज खरे ठरल्याचे दिसते आहे. शेतमालाचा खुला व्यापार, जागतिक व्यापार करार, बौध्दिक संपदेच्या हक्कांचे महत्व, जनुकीय वाण, बदलत्या हवामानाशी सामना या सा-या विषयावर शेतकरी संघटनेकडे व्यापक व सखोल साहित्य उपलब्ध आहे. प्रचलित राजकारणातील अर्थकारणाला ते झेपवेलच असे नाही म्हणून सत्तेच्या राजकारणात जे फायद्याचे ते स्विकारायचे जे अडचणीचे त्याकडे कानाडोळा करायचा अशी एकंदरीत भारतीय कृषिक्षेत्राची या व्यवस्थेतील वाटचाल आहे. भारतीय राजकारणच नव्हे तर अर्थकारणावर एवढा खोल ठसा उमटवणा-या शेतकरी आंदोलनांनी यापेक्षा आणिक काय राजकारण करावे अशी यादवांची अपेक्षा आहे ?
यादवांना कदाचित शेतकरी आंदोलनाला सत्तेच्या राजकारणाच्या यशापयशात जोखायचे असावे. निवडून येण्याची क्षमता आज कशामुळे येते हे त्यांच्यासारख्या निवडणूक तज्ञाला सांगायची आवश्यकता नाही. आजच्या राजकारणात शेतकरी संघटनेसारखी तात्विक भूमिका घेणारे निवडून येऊ शकत नाहीत हे वास्तव शेतकरी संघटनेच्या विचारांची शुध्दताच अधोरेखित करणारे आहे. तेव्हा प्रश्न शेतक-यांनी राजकारण करण्याचा नसून राज्यकर्त्यांनी लोकशाहीला अपेक्षित असलेल्या न्याय्य भूमिका घेत राजकारण करण्याचा आहे.
आजच्या शेतीची अवस्था अतिशय गंभीर झाली असून शेतीवर कोसळणा-या संकटाची व्याप्तीही वाढतच चालली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तींचा मारा तर दुसरीकडे बेधुंद सुलतानी धोरणांचा सपाटा. देशाच्या लोकसंख्येत एवढ्या प्रचंड संख्येनी असणारा हा शेतकरी वर्ग मात्र आपल्याला एकवर्गीय मानत नाही. भौगोलिक वेगळेपणाबरोबर विविध जातीधर्मात विभागलेल्या या वर्गाचे राजकीय वर्तन मात्र दिशाहीन वा भाकड असते. म्हणजे लोकशाहीतील प्रमुख हत्यार असलेल्या निवडणुकांमध्येही शेतकरी म्हणून काही प्रतिनिधित्व व्यक्त होतांना दिसत नाही. जे कोणी शेतक-यांच्या हिताच्या नावाने निवडून जातात ते तिथे गेल्यावर कसे वागतात याचा पूर्वानुभव व आजचा प्रत्यक्ष अनुभव कृषिक्षेत्राला येतो आहे. या क्षेत्राची धुळधाण बघता सा-या राजकीय व्यवस्थेने आपले सारे कार्यक्रम बाजूला ठेवत दुस-या महायुध्दानंतर जखमी राष्ट्रांना बळ देण्यासाठी केलेल्या मार्शल प्लॅनसारखा एकलमी कार्यक्रम आखावा व या क्षेत्राला वाचवावे ही खरे म्हणजे काळाची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात सरकारने झोपेचे सोंग घेतल्याने सत्तेपुढे शहाणपण नाही हीच म्हण खरी ठरते आहे.
दुर्दैवाने भारतीय शेती आज गावातील सुंदर व तरूण विधवेसारखी झाली आहे. तिच्या कारूण्यकथा रंगवतांनाच तिला मदत करण्याची अहअहमिका व त्या निमित्ताने तिच्या डोक्यावरून वा पाठीवरून हात फिरवत आपला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल या विचाराने सा-या सत्तापिपासूंना ग्रासले आहे. बोलायचे सगळ्यांनी मात्र करायचे कुणीच नाही अशा विचित्र अवस्थेत सापडलेल्या या शेतीला सध्यातरी या राजकीय व्यवस्थेतून मिळेल असे दिसत नाही. म्हणून प्रश्न हा शेतक-यांनी करावयाच्या राजकारणाचा नसून राजकारणात सक्रीय असलेल्या घटकांनी सहवेदना दाखवत प्रत्यक्ष करावयाच्या कृती कार्यक्रमाचा आहे. आपल्या वरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी लोकशाहीताल प्रत्येक घटक जर असा प्रत्यक्ष राजकारण करू लागला तर संसदेचे कुरूक्षेत्र होत कोणाच्याच हाती काही लागणार नाही हे लक्षात ठेवलेले बरे.
                                 डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com   

Monday, 24 August 2015

कांदा – कृषि अर्थकारणातील आतंकवाद !!




आजवर इतर क्षेत्रातील आतंकवादामुळे जेवढी आर्थिक वा जिवित हानी झाली नसेल त्यापेक्षा कित्येक पटीने कृषिक्षेत्राच्या शेतमालातील आर्थिक आतंकवादाने झाली आहे. देशाचे कृषि उत्पादन हे ज्या पटीत वाढले आहे तेवढ्याच पटीत शेतक-यांच्या हलाखीत वाढ झाली आहे ही कुणा अर्थकारण्याच्या लक्षात न येणारी बाब संबंधितांचे उपाय शोधण्यातील अपयशच अधोरेखित करते. उत्पादनाच्या ख-या किमतीतील नफ्याचा वाटा शेतक-यांपर्यंत पोहचू न शकण्याची नेमकी काय कारणे आहे हे आजवर पटलावर येऊन देखील सरकार मात्र कारवाईच्या बाबतीत अंधारातच चाचपडते आहे.
आताही कांद्याच्या दरवाढीचे खरे कारण हे कांद्याची टंचाई नसून विकृत एकाधिकार करणारी व्यवस्था, कायदे व धोरणे आहेत याबाबत कोणी बोलायला तयार नाही. निर्यात बंदी वा परदेशी कांद्याच्या आयातीसारखे निष्फळ प्रयत्न माध्यमांत गाजावाजा करीत असले तरी त्याचा परिणाम म्हणून बाजारात प्रत्यक्ष शेतकरी वा ग्राहक यांच्या हिताची एकही गोष्ट होतांना दिसत नाही. ना तर शेतक-यांना या वाढत्या दराचा फायदा होतोय, ना तर ग्राहकांना किफायतशीर दरात कांदा उपलब्ध होतोय. वास्तवात हे या दोन्ही घटकांचे वैधानिक अधिकार आहेत. व ते मिळवून देण्याची  वा राखण्याची वैधानिक जबाबदारीही सरकारचीच आहे. याविषयावर सरकारचे मौन मात्र अनाकलनीय असून यावर परिणाम करणा-या अत्यंत साध्या साध्या गोष्टींची अंमलबजावणी करायला सरकार का अपयशी ठरतेय यामागची कारणे शोधलीत तर हे गौडबंगाल लक्षात येते व शेतकरी वा ग्राहक यांच्या दृष्टीने ही सारी लढाई किती कठीण आहे हेही लक्षात येते.
कांद्याच्या टंचाईमुळे ही दरवाढ झालीय या सरकारसकट लावलेल्या घोषाचे मुख्य कारण ख-या कारणाकडे लक्ष जाऊ नये हेच आहे व ते माध्यमातून ठसवले जात आहे. मात्र बाजारात कांदा टंचाईदृष्य नसून आपली जर वाढीव किंमत देण्याची तयारी असेल तर कितीही कांदा उपलब्ध आहे हे आपण अगोदर लक्षात घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षातील कांद्याच्या प्रमुख बाजार पेठांच्या आवकेचे आकडे बघितले तर ऑगस्ट व सप्टेबर या महिन्यात आवकच नसते कारण शेतक-यांकडे या काळात कांदाच नसतो. बाजार समितीत आवक नसली म्हणून बाजारात कांदा नसतो असे समजणे चूकीचे आहे. साधारणतः साठवण योग्य व निर्यातक्षम उन्हाळी कांदा जानेवारीत यायला सुरवात होते.  बव्हंशी शेतक-यांकडचा ताजा माल जाने ते मार्च या काळात ७०० ते १००० च्या भावात अगोदरच विकला गेलेला असतो व तो व्यापा-याकडे असतो. याच मालातून साधारणतः एकूण उत्पादनाच्या दहा टक्के गुणवत्तेच्या मालाची निर्यांत याच काळात होते. त्यामुळेच नंतरच्या काळात कितीही निर्यात बंदी लादली तरी देशांतर्गत भावावर तिचा काही परिणाम दिसत नाही. एकदा हा खरेदीचा मुख्य बहर ओसरल्यानंतर देशांतर्गत गरज ही व्यापा-याकडील मालातून व शेतक-यांनी वाढीव भावाच्या आशेने साठवून ठेवलेल्या मालातून भागत असते. मात्र पाऊस पडल्यानंतर शेतक-यांच्या आर्थिक गरजांनुसार त्यांनी साठवलेला मालही बाजारात येऊन जातो व त्याला वाढीव दराचे आमिषही दाखवले जाते. मात्र हा वाढीव दर १२०० ते १७०० च असतो व तोही सर्वांनाच सारखा मिळाला असेही नसते. एकदा शेतक-यांकडचा कांदा संपला की एक दोन बाजार समित्यात कांद्याला अचानकपणे मिळालेल्या प्रचंड भावाच्या बातम्या येऊ लागतात. हे दर मात्र अभूतपूर्व असतात. या बातम्यांमध्ये सदरचा दर किती शेतक-यांना मिळाला हे मात्र गुलदस्त्यात असते. या बातम्यांपाठोपाठ किरकोळ बाजारातील दरही ताबडतोबीने त्याप्रमाणात वाढतात, जसे यावेळी लासलगावला कांद्याला ३६००चा भाव मिळाल्याची बातमी येताच किरकोळ बाजारात त्याच दिवशी कांद्याचा दर ५० रू झाला. या तेजीची चाहूल लागताच या पुरवठा साखळीतील सारे घटक कांद्याची साठेबाजी करतात व प्रमुख विक्रेत्याकडील साठा आटोक्यात आणतात. नंतरच्या काळात टंचाईचा गाजावाजा करीत वेगवेगळ्या बाजार समित्यातील एकाददुस-या विक्रेत्याला मिळालेल्या भावाचे उच्चांकी आकडे प्रसिध्द होत रहातात व प्रमुख व्यापा-यांपासून ते रस्त्यावरच्या किरकोळ विक्रेत्यांकडील सा-या मालाचे भाव चढत्या भाजणीत वाढत रहातात. आज चढ्या भावाने विक्री होणारा कांदा काय भावाने खरेदी झालाय व शेतक-यांला त्याचे काय मोल मिळाले हे शोधणे फार कठीण असते कारण या सा-या व्यवहाराची नोंद कुठेही ठेवली जात नाही.
वास्तवात बाजार समिती कायद्यानुसार  बाजार समितीत आलेल्या प्रत्येक शेतमालाचे वजन होऊन त्याची नोंद होणे आवश्यक असते. हा माल आडत्याने कुठल्या व्यापा-याला काय भावाने विकला हे शेतक-याला कळवणे कायद्याने बंधनकारक असते. मुख्य व्यापा-याने सदरचा माल कुणाला कधी काय भावाने विकला या नोंदीसुध्दा करविवरणाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात. या नोंदीवरून कांद्याची बाजारात होणारी हालचाल समजू शकते. मात्र या सा-या व्यवहारांच्या वास्तव नोंदी ना तर कुठल्या बाजार समित्या ठेवतात ना ते ठेवण्याचा आग्रह नियंत्रण ठेवणारे पणन खाते ठेवते. त्यामुळे परिस्थितीजन्य कारणांनरूनच अशा कृत्रिम तेजीची मीमांसा करावी लागते, त्यातून खरी कारणे समजली तरी कारवाईच्या दृष्टीने त्या फारशा उपयोगी ठरत नाहीत.
आज अत्यंत अडचणीत सापडलेल्या या शेतमाल बाजार व्यवस्थेत ताबडतोबीने काही सुधारांची फार आवश्यकता आहे. विशेषतः बंदिस्तपणामुळे येणा-या एकाधिकारशाहीमुळे ज्या काही विकृती तयार झाल्या आहेत त्यावर खुलेपणा आणून सारा बाजारच एका नव्या मानसिकतेत नेणे हे ग्राहकाच्या तर आहेच परंतु आर्थिक विपन्नावस्थेत आलेल्या शेतक-यांच्या दृष्टाने फार गरजेचे आहे. बाजाराचे मुख्य ध्येय हे उत्पादक व ग्राहक यांचे हित पहाणे हे असते, मात्र या सा-याची नेमकी जबाबदारी कोणाची हे निश्चित होत नसल्याने हा आतंकवाद सहन करणे हेच शेतकरी व ग्राहकांच्या हाती उरले आहे.
                                                          डॉ. गिरधर पाटील ९४२२२६३६८९

Thursday, 7 May 2015

अगा जे घडलेचि नाही ?



शेतक-यांनी आता राजकारण करावे, असा सल्ला निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांनी दिला आहे (दै लोकसत्ता २९ एप्रिल). दर दहा वर्षात शेतक-यांचे राजकारण एक पाऊल मागे जाते हे त्यांचे निरिक्षण, म्हणजे चौधरी चरण सिंह व टिकैत यांच्या पन्नास वर्षापूर्वीच्या आंदोलनाशी संबंधित असल्याचेही अधोरेखित झाले आहे. मात्र त्याच दरम्यान केवळ भारतातच नव्हे तर सा-या जगात शेतकरी आंदोलनाला एक नवे आर्थिक परिमाण देत दैववादी शेतीला एक व्यावहारिक चेहरा देणारे व राजकारणातील सारे उच्चांक मोडणारे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन ते सोईस्कर विसरलेले दिसतात. शरद जोशींचा साधा उल्लेखसुध्दा झेपवत नाही हे आत्ममग्न साहित्य संमेलनात सिध्द झाले असतांनाच योगेंद्र यादवांसारख्या राजकारणाच्या अभ्यासकानेही त्याच मार्गाने जावे यातही योगायोगच समजला पाहिजे.  याच आंदोलनाच्या यशाची इतर परिमाणे कदाचित यादवांना तो विचार समजून कळाली तर ठीकच आहे, अन्यथा त्या काळातील ५-५ लाखाच्या सभा व शेतकरी समाजातील पुरूषच नव्हे तर सा-या बायाबापड्या घरच्या भाकरी बांधून आपल्यावरील अन्यायाविरोधात आंदोलनात उभ्या रहात याचे पुरावे तर सा-या माध्यमांत उपलब्ध आहेत. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात तीन लाख स्त्रिया तीन दिवस ज्या शिस्तबध्द पध्दतीने आपल्या समस्यांचा अभ्यास करत जे काही ठराव मांडत्या झाल्या ते यादवांनी एकदा डोळ्याखालून घालावे म्हणजे शेतकरी राजकारण ज्या उंचीला पोहचले होते त्याचा काहीतरी मागोवा त्यांना घेता येईल. आज शेतीवर ज्या गुणवत्तेचे साहित्य उपलब्ध आहे त्यात शेतकरी संघटनेच्या साहित्याचा उल्लेख कुणालाही टाळता येणार नाही. शेतीचे अर्थशास्त्र व सरकारी धोरणांचा शेतीवरचा प्रभाव हे या विचारांचे मर्मस्थान आहे. माध्यमांत देखील शेतकरी संघटनेच्या विचाराला एक मानाचे स्थान आहे. ज्या विचारावर हे सारे आंदोलन उभे आहे तो शेतक-यांनाच भावला असे नाही तर भारतात व परदेशात अनेकांनी त्याच्या अभ्यासावर डॉक्टरेट मिळवल्या आहेत  हेही यादवांच्या माहितीसाठी देता येईल. डॉ. आशुतोष वर्शेन-हॉर्वर्ड, डॉ. कॅनन लेलेनबर्ग-मेलबोर्न, डॉ. स्टाफन लिंडबर्ग-स्विडन, माईक यंगब्लड-अमेरिका, गेल ऑम्वेट-कॅलिफोर्निया, डॉ.एकनाथ खांदवे-पुणे ही त्या विद्यापीठांसह त्यातली ठळक उदाहरणे. याच बरोबर या आंदोलनाची स्थानिक राजकारण्यानी घेतलेली धास्ती व हे आंदोलन चिरडण्यासाठी केलेली व्युहरचना ही दिल्लीश्वरांनी घेतलेला धसका दाखवण्याइतपत पुरेशी आहे. भले जी राजकीय परिमाणे लावून यादव या आंदोलनाच्या यशापशाची मीमांसा करीत असले तरी त्याचा साधा उल्लेखही त्यांनी करू नये इतके क्षुल्लकही ते नाही.
मी व योगेंद्रजींनी आपच्या धोरण समितीचे सदस्य म्हणून काही दिवस एकत्र काम केले आहे. माझा विषयच शेती असल्याने या नव्या पक्षात शेतीबाबत कुठून सुरूवात करावी याचा प्रश्न पडत असे. एकाद्या विषयात मान्यता मिळवलेल्या विचारवंताच्याही आकलनात कसा एकारलेपणा असतो ते त्याठिकाणी अनुभवण्यास आले. एकंदरीत शेतीबाबत भारतीय राजकारणात आज जे काही चालले आहे त्याबद्दलचा सखोल उहापोह शेतकरी संघटनेने कधीच केला आहे. आज नवी वाटणारी भूसंपादनाच्या बाबतीत शेतकरी संघटनेने मांडलेली भागीदारीची संकल्पना आज प्रत्यक्षात मगरपट्टा व भामा कंस्ट्रक्शन यांनी अंमलात आणली आहे. आज सारे राजकारणी जी भाषा बोलताहेत तिचा उगम शेतकरी संघटनेने मांडलेल्या विचारात दिसून येईल. एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनेच्या सुरूवातीच्या काळात आपल्या सत्ताबळावर शेतकरी संघटनेची मते कशी चूकीची आहेत हे हिरीरीने मांडणा-या दिग्गजांना देखील सारी मांडणी जशीच्या तशी स्विकारावी लागली व आपण कळतनकळत शेतकरी संघटनेवर आपल्या राजकारणासाठी अन्यायच केला हे जाहीररित्या मान्य करावे लागले, यापेक्षा अधिक राजकारण शेतक-यांनी काय करावे याचा यादवांनीच विचार करावयाचा आहे.
आज महाराष्ट्रातच नव्हे तर सा-या भारतातील शेतीला एक नवा चेहरा देण्याचे काम शेतकरी संघटनेने केलेले आहे.  किसान समन्वय समिती ही देशातील शेतक-यांच्या संघटनांची शिखर संस्था वेळोवेळी शेतीसंबंधी प्रश्नांवर अभ्यासपूर्वक निर्णय घेत असते. या निर्णयांचा सरकार दरबारी योग्य तो वापर झाल्याचीही उदाहरणे आहेत. उदारीकरण, खुलीकरण वा खासगीकरण यावर जाहीर भूमिका घेत जागतिक व्यापार संस्थेबाबत निश्चित अशी तात्विक भूमिका सर्वात अगोदर शेतकरी संघटनेने घेतली. डंकेल प्रस्ताव हा शेतक-यांच्या हिताचा आहे ही ९१ साली घेतलेली भूमिका आजच्या शेतीला आलेल्या आर्थिक परिमाणाची द्योतक आहे. एरवी प्रचंड राजाश्रय व संरक्षण लाभलेल्या सहकार क्षेत्राला घरघर लागत ते लयाला जाईल हे ऐशीच्या दशकातले भाष्य आज खरे ठरते आहे. जागतिकीरणात होत असलेली हेळसांड लक्षात घेता डॉलर शेवटी ६० रुपयांपर्यंत जाईल हे भाकितही शेतकरी संघटनेचेच, ते आज खरे ठरल्याचे दिसते आहे. शेतमालाचा खुला व्यापार, जागतिक व्यापार करार, बौध्दिक संपदेच्या हक्कांचे महत्व, जनुकीय वाण, बदलत्या हवामानाशी सामना या सा-या विषयावर शेतकरी संघटनेकडे व्यापक व सखोल साहित्य उपलब्ध आहे. प्रचलित राजकारणातील अर्थकारणाला ते झेपवेलच असे नाही म्हणून सत्तेच्या राजकारणात जे फायद्याचे ते स्विकारायचे जे अडचणीचे त्याकडे कानाडोळा करायचा अशी एकंदरीत भारतीय कृषिक्षेत्राची या व्यवस्थेतील वाटचाल आहे. भारतीय राजकारणच नव्हे तर अर्थकारणावर एवढा खोल ठसा उमटवणा-या शेतकरी आंदोलनांनी यापेक्षा आणिक काय राजकारण करावे अशी यादवांची अपेक्षा आहे ?
यादवांना कदाचित शेतकरी आंदोलनाला सत्तेच्या राजकारणाच्या यशापयशात जोखायचे असावे. निवडून येण्याची क्षमता आज कशामुळे येते हे त्यांच्यासारख्या निवडणूक तज्ञाला सांगायची आवश्यकता नाही. आजच्या राजकारणात शेतकरी संघटनेसारखी तात्विक भूमिका घेणारे निवडून येऊ शकत नाहीत हे वास्तव शेतकरी संघटनेच्या विचारांची शुध्दताच अधोरेखित करणारे आहे. तेव्हा प्रश्न शेतक-यांनी राजकारण करण्याचा नसून राज्यकर्त्यांनी लोकशाहीला अपेक्षित असलेल्या न्याय्य भूमिका घेत राजकारण करण्याचा आहे.
आजच्या शेतीची अवस्था अतिशय गंभीर झाली असून शेतीवर कोसळणा-या संकटाची व्याप्तीही वाढतच चालली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तींचा मारा तर दुसरीकडे बेधुंद सुलतानी धोरणांचा सपाटा. देशाच्या लोकसंख्येत एवढ्या प्रचंड संख्येनी असणारा हा शेतकरी वर्ग मात्र आपल्याला एकवर्गीय मानत नाही. भौगोलिक वेगळेपणाबरोबर विविध जातीधर्मात विभागलेल्या या वर्गाचे राजकीय वर्तन मात्र दिशाहीन वा भाकड असते. म्हणजे लोकशाहीतील प्रमुख हत्यार असलेल्या निवडणुकांमध्येही शेतकरी म्हणून काही प्रतिनिधित्व व्यक्त होतांना दिसत नाही. जे कोणी शेतक-यांच्या हिताच्या नावाने निवडून जातात ते तिथे गेल्यावर कसे वागतात याचा पूर्वानुभव व आजचा प्रत्यक्ष अनुभव कृषिक्षेत्राला येतो आहे. या क्षेत्राची धुळधाण बघता सा-या राजकीय व्यवस्थेने आपले सारे कार्यक्रम बाजूला ठेवत दुस-या महायुध्दानंतर जखमी राष्ट्रांना बळ देण्यासाठी केलेल्या मार्शल प्लॅनसारखा एकलमी कार्यक्रम आखावा व या क्षेत्राला वाचवावे ही खरे म्हणजे काळाची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात सरकारने झोपेचे सोंग घेतल्याने सत्तेपुढे शहाणपण नाही हीच म्हण खरी ठरते आहे.
दुर्दैवाने भारतीय शेती आज गावातील सुंदर व तरूण विधवेसारखी झाली आहे. तिच्या कारूण्यकथा रंगवतांनाच तिला मदत करण्याची अहअहमिका व त्या निमित्ताने तिच्या डोक्यावरून वा पाठीवरून हात फिरवत आपला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल या विचाराने सा-या सत्तापिपासूंना ग्रासले आहे. बोलायचे सगळ्यांनी मात्र करायचे कुणीच नाही अशा विचित्र अवस्थेत सापडलेल्या या शेतीला सध्यातरी या राजकीय व्यवस्थेतून मिळेल असे दिसत नाही. म्हणून प्रश्न हा शेतक-यांनी करावयाच्या राजकारणाचा नसून राजकारणात सक्रीय असलेल्या घटकांनी सहवेदना दाखवत प्रत्यक्ष करावयाच्या कृती कार्यक्रमाचा आहे. आपल्या वरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी लोकशाहीताल प्रत्येक घटक जर असा प्रत्यक्ष राजकारण करू लागला तर संसदेचे कुरूक्षेत्र होत कोणाच्याच हाती काही लागणार नाही हे लक्षात ठेवलेले बरे.
                                 डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com